वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील मंगळवार (दि.26)च्या आठवडे बाजारामध्ये मार्गशीर्ष महिन्यामुळे, तसेच पाण्याअभावी कमी प्रमाणात उत्पादन होत असलेला भाजीपाल्यांचे बाजारभाव वधारले होते. यावर्षी, मान्सूनपूर्व व मान्सून व परतीचा पाऊस पडला नव्हता. यामुळे वाल्हे व परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांवर पावसाळ्या पासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नसल्याने, शेतातील पिके करपून गेली आहेत.
पाण्याअभावी भाजीपाला पिकविण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. यामुळे तालुक्यातील अनेक आठवडे बाजारात बाहेरील व्यापारी पुणे मार्केट यार्डमधून भाजीपाला खरेदी करून आणून तालुक्यात आठवडे बाजारात विकत आहेत. यामुळे व्यापारी वर्गालाही खरेदी केलेला माल ठिकठिकाणाच्या आठवडे बाजारात पोहोचण्यासाठी वाहतूक खर्च वाढत असल्याने भाजीपाल्याचा बाजारभाव दिवसेंदिवस वाढत आहेत.
पुरंदर तालुक्यातील जवळपास सर्वच विहीरीनी तळ घाटला असून, यामुळे तालुक्यातील बहुतांश शेती मोकळी पडलीले दिवस आहे. दरम्यान, शेतीतील उत्पादन शून्य असल्याने व दुसरा आर्थिक स्त्रोत नसल्याने आठवडे बाजारात जाऊन तरी, चढ्या दराने, विक्री होत असलेली तरकारी, कशी खरेदी करायची ? असा प्रश्न वाल्हे व परिसरातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरीवर्गाला पडला आहे.
तरकारी 20 ते 30 रुपये पावशेर
वाल्हे आठवडे बाजारात मंगळवारी जवळपास सर्वच तरकारी वस्तू किमान 20 ते 30 रूपये पावशेर या दराने विक्रस होत्या. यामुळे आगोदर दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरीवर्ग संकटात असताना, वाढत्या महागाईने आर्थिक संकट ओढावत आहे.