शेतकर्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी
नारायणगाव – जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने शेत पिकाच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश आमदार अतुल बेनके यांनी दिले आहे.
जुन्नर तालुक्यात रविवारी (दि. 26) अचानक झालेल्या वादळी वार्यासह गारपीट व अवकाळी पावसाने कांदा, मका, द्राक्षे, भात, डाळिंब, कांदा पीक आणि साठवलेल्या कांद्यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास अचानक हिरावल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून हवालदिल झाला आहे.
आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यातील राजुरीसह आदिवासी भागात झालेल्या नुकसानाची शेतकर्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्यांना आधार देण्याचे काम केले. वादळी पाऊस, गारपीट यामुळे बळीराजावर अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.
थेट मला संपर्क करा
प्रशासकीय अधिकारी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बांधावर पोहोचला नसेल तर शेतकरी अथवा गावच्या सरपंचांनी तसे निदर्शनास आणून द्यावे. अथवा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन आमदार बेनके यांनी केले.