हिंजवडी – रविवारी रात्री विजांच्या कडकडाट व वादळी वार्यासह झालेल्या पावसात वीज वाहक केबल जनावरांच्या गोठ्यावर पडल्याने लोखंडी पत्र्याच्या गोठ्यात विद्युत प्रवाह उतरल्याने नऊ गाईसह एका वासराचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कासरसाई येथील प्रसिद्ध दुग्धव्यावसायिक आणि प्रगतिशील शेतकरी राजेंद्र शिखरे यांच्या गोठ्यात घडली. यामध्ये त्यांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. शिखरे यांच्या सर्व गाई दुभत्या होत्या.
रविवारी (दि.26) रात्री अचानक वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर शिखरे यांच्या दोन गाई दगावल्या. त्यातच वीजपुरवठा खंडित होऊन सर्वत्र अंधार होता. त्यांना वाटले वीज कोसळली असावी किंवा साप चावला असावा म्हणून गाई दगवल्यात. परंतु मध्यरात्रीला जेव्हा वीजप्रवाह पुन्हा सुरू होऊन अन्य गायींना विजेचा शॉक बसून उर्वरीत 7 गायी व एक वासरू मृत्युमुखी पडल्याचे दुसर्या दिवशी सकाळी त्यांच्या लक्षात आले.
सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा विक्रम शिखरे गाईच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेला असता हा धक्कादायक प्रकार त्याच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ वीजपुरवठा खंडित करून याबाबतची माहिती वीज वितरण कंपनी व पशुवैद्यकीय अधिकार्यांना दिली.
या दुर्घटनेत शिखरे कुटुंबीयांचे सुमारे 8-10 लाखापर्यंत आर्थिक नुकसान झाले असल्याची शक्यता राजेंद्र शिखरे यांनी व्यक्त केली.त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आपत्कालीन घटनेची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शिखरे यांनी केली आहे. दरम्यान सोमवारी या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभाग व वीज वितरणच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट घेत पंचनामा केला. शिखरे कुटुंबाचे सांत्वन करत शासनाकडून काही मदत व नुकसानभरपाई देता येईल का याबाबत चर्चा करून तसा प्रस्ताव केला जाणार असल्याची ग्वाही दिली असल्याचे विक्रम शिखरे यांनी सांगितले.
ऊसतोड मजूरही भयभीत…
अवकाळी पावसाचा तडाखा कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांना देखील बसला. विजांच्या कडकडाटाने आणि वादळी वार्याने कारखाना क्षेत्राच्या आवारात गवती झोपड्यांमध्ये राहणार्या मजुरांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांच्या घरात पाणी शिरले. तर जनावरे उघड्यावर असल्याने भीतीचे वातावरण होते. सुमारे तीन तास कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने गावात विजेचा लपंडाव सुरू होता.