वाल्हे – यावर्षी पुरंदर तालुक्यात पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्याने अनेक गावांत वाड्या-वस्त्यांवर पिण्यासाठीच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच शेतीसाठी पाणीटंचाई असल्याने, पशुधनास हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने, वाल्हे (ता.पुरंदर) पशुधन संकटात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत जनावरांच्या हिरव्या चार्यांचा तुटवडा जाणवत असून हिरवा चारा म्हणून अनेकजण ऊसाचे वाढे वापरा आहेत. यावर्षी पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने तालुक्यात अनेक गावांत जनावरांचा चार्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. तसेच अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून पुढील काही दिवसांतच भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याची भीती पशुपालक व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील अनेक गावांत पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नसल्याने शेतात तर हिरवा चारा मिळेल जिकीरीचे बनले आहे. पुढील काळात पशुधन वाचवायचे असेल तर, शासनाने त्वरीत जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देणे गरजेचे असून शासनान त्वरित शेजारील तालुक्यातील गावातून जनावरांना चारा आणून, पुरंदर तालुक्यातील पशुधन वाचवावे अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.
भाव गगनाला भिडले
पुरंदर तालुक्यातील अनेक गावातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने पाण्याबरोबर जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातच ज्यांच्याकडे चारा आहे त्यांनी त्या चार्याचे भाव गगनाला भिडले असून पावसाअभावी यंदा खरीप, रब्बी हंगामातील हिरवा चार्याचे उत्पादन आले नाही.
तो चाराही करपू गेला
तालुक्यातील अनेक भागात उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले होते. सुरुवातीला रिमझीम झालेल्या पावसावर खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. पाऊस नसल्याने पिके कोमेजून गेली होती. तसेच डोंगर परिसरात थोड्या प्रमाणात जनावरांना चरण्यासाठी चारा उपलब्ध झाला होता. मात्र, मागील दोन-तीन महिन्यांपासून, हा चारा देखील करपून गेला असून शेतकर्यांना इतर ठिकाणाहून हिरवा चारा विकत आणावा लागत आहे.
उसाचा दर 4 ते 4500 हजार रुपये टन
कडबा 5 हजार रुपये शेकडा
घास शेकडा दर 500 रुपये
हिरवा मका 4 हजार रुपये
“यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक भागात चार्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिके करपून गेले असून मागच्या वर्षाचा चारा संपला आहे. त्यामुळे विकत चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहे. पुढील काही दिवसांत जनावरे जगवावी कशी? यांचीच चिंता लागली आहे.” – जयवंत भुजबळ, पशुपालक शेतकरी, वाल्हे
“शासनाने जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून पुरंदर तालुक्यातील पशुधन वाचवावे. नाहीतर, पुढील काही दिवसांतच, पशुपालक, दावणीची जनावरे विक्रीसाठी काढतील.” – धनंजय गायकवाड, पशुपालक शेतकरी, वाल्हे.