राजगुरूनगर -मराठा समाजपुाला आरक्षण मिळण्यासाठी मी मराठा क्रांती मोर्चासोबत आहे. आरक्षण मिळण्यासाठी प्रसंगी आमदारकीवर पाणी सोडायला देखील कमी करणार नाही, असे प्रतिपादन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
खेड तालुका सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने आमदार मोहिते पाटील यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे वामन बाजारे, मनोहर वाडेकर, अमित टाकळकर, रुपाली राक्षे, चेतन शेटे, विठ्ठल पाचारणे, प्रमोद वाडेकर, विजय गोकुळे, अक्षता कान्हुरकर, अशोक मांडेकर, सौरभ दौंडकर आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होतो. त्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना निवेदन दिले.
आमदार मोहिते म्हणाले, न्यायालयासमोर बाजू मांडायला कमी पडलो असे आंदोलक म्हणत आहेत. न्यायालयात बाजू मांडू नये यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. मराठा आरक्षण नाकारण्याचे काम भाजप सरकारने केले. राज्यात वाद निर्माण करून कळीचा मुद्दा तयार करण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. देशात भाजप सरकार आहे. पंतप्रधान हुकूमशहासारखे काम करीत आहेत.
मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसरे कोणीतरी आपली शिकार करीत आहे, हे मराठा बांधवांनी लक्षात घ्यावे. राज्यातील सर्व खासदार, आमदार मराठा आंदोलकांसोबत आहोत. कारण तुम्ही आम्हाला निवडून दिले आहे. आंदोलनासाठी पोलिसांच्या माध्यमातून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, यांच्यासह जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात होते. याआंदोलनाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन वामन बाजारे यांनी केले.
आणि मला दंगलीचा सूत्रधार बनवले -मोहिते
चाकण मराठा मोर्चा आंदोलनाची सर्वाधिक किंमत मला मोजावी लागली आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला हे सर्व करण्यामागे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस हेच होते. त्यांचेच षडयंत्र होते. तत्कालीन पुण्याचे पोलीस आयुक्त पद्मनाभमन यांनी स्वतः सांगितले की, गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीस यांनी दबाव टाकला होता. गुन्हा अशा पद्धतीचा दाखल केला की ज्यांचा काहीच संबंध नाही. मला दंगलीचा सूत्रधार बनवले. पुढे आंदोलकांना त्रास झाला नाही मला कित्येक महिने त्रास सहन करावा लागला.
मी मराठा क्रांती मोर्चाचाच माणूस
‘दिलीप मोहिते हा मराठा क्रांती मोर्चाचाच माणूस आहे’. मला निवेदन देण्यापेक्षा मी तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे यायला तयार आहे. पण तुम्हीच मला बरोबर घेतलं नाही याची खंत आहे. मी तुमचा एक भाग होतो, तुम्ही मला नेले भाषणे करायला लावली, चाकणच्या उपोषणादरम्यान तत्कालीन चाकण पोलीस निरीक्षकासोबत मी वाद घातला. त्याने पुढे याचा कसा कसूर काढला, याची सर्वांना जाणीव आहे. मी आणि माझ्या पक्षातील सर्व कार्यकर्ते मराठा मोर्चा सोबत राहतील. मी सर्व नेत्यांना मराठा आरक्षणाबाबत पत्रव्यवहार करणार आहे.
समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यात 58 महामोर्चे काढूनही राज्य शासनाने रस्त्यावर आणण्याची वेळ आणली आहे. राज्यातील मराठे पुढे जातील तेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आमचा आक्रोश आहे. आरक्षण मिळाले नाही तर यापुढेही आंदोलने केली जातील.
-मनोहर वाडेकर, आंदोलक नेते