थेट सरपंचपदाचा परिणाम : ग्रामपंचायतींसाठी गावोगावी गटांची मोर्चेबांधणी
विजय शिंदे
वडापुरी – इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले आहे. यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा ग्रामपंचायतचा समावेश असून मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांच्या शेळगाव या गावाचाही समावेश आहे. दिवाळीपूर्वी या ग्रामपंचायतींना नवे पदाधिकारी मिळणार आहेत. यासाठी प्रत्येक गावातील विविध गटांच्या पदाधिकाऱ्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या निवडणुकीत थेट सरपंच निवड असल्याने तालुक्यात सरपंच पदाचेच डोहाळे अनेकांना लागल्याचे दिसून येत आहे; मात्र सदस्य पदासाठी इच्छुकांची संख्या कमी दिसून येत आहे. सदस्यपदासाठी उमेदवार शोधून गावागावांतील नेत्यांना त्यांची मनधरणी करताना दमछाक होत आहे.
सरपंच पद हे थेट जनतेतून असल्यामुळे सध्या सरपंच होण्याचे डोहाळे अनेकांना लागले. तर सदस्य पदाचा उमेदवार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
14 व 15 व्या आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायत खात्यावर जमा होत आहे. तसेच अन्य निधीच्या माध्यमातून विकासकामे करताना यातून आर्थिक उत्पन्नाच्या संधीही असते. यामुळे गावपातळीवरील नेत्याचा सरपंच पदावरच डोळा लागला. सरपंच पदाची निवड थेट असल्याने परिणामी सदस्य होणाऱ्यांना फारसे महत्त्व नसल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा, विधानसभेची रंगीत तालीम
या निवडणुकीनंतर सहा महिन्यांत लोकसभा निवडणूक आहे, तर 11 महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे. या परिस्थितीत आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. मोहोळचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रवीण माने यांचे गट या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. या नेत्यांना आपले राजकीय वर्चस्व दाखवण्यासाठी या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरणाऱ्याना आर्थिक ताकद द्यावी लागणार आहे.