जनावरे गेली वाहून; शेळ्यांचा मृत्यू
शिक्रापूर – शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी सायंकाळी ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तळोले वस्ती व खर्डे वस्ती येथील तलाव फुटल्याने गावातील गावठाणात पाणी शिरले. अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली तर शेळ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये एका कुटुंबाचे घर देखील पूर्णपणे वाहून गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
कान्हूर मेसाईसह शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, तळोले वस्ती व खर्डे वस्ती येथील तलाव फुटल्याने गावठाणात दैना झाली. यावेळी काही घरात पाणी घुसून नागरिकांच्या घरातील साहित्य तसेच एका किराणा दुकानातील साहित्य काही शेतकऱ्यांच्या शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. रात्री पाण्याची पातळी वाढल्याने स्थानिक नागरिकांनी ओढ्यालगतच्या घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी आसरा दिला. यावेळी बाबू जयवंत थोरात यांचे जुने घर सर्व साहित्यांसह पूर्णपणे पाण्यात वाहून गेले आहे.
नागरिकांच्या गोठ्यात पाणी गेल्याने पाच शेळ्यांचा मृत्यू झाला. मात्र, रात्रीच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाल्याने कान्हूर मेसाई येथील पंचवीस ते तीस कुटुंबाचे मोठे नुकसान होऊन बाबू जयवंत थोरात यांचे पूर्ण घर सर्व साहित्यांसह वाहून गेले.
शिरुरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, मंडलाधिकारी प्रशांत शेटे, कान्हूर मेसाईचे तलाठी अभिजित जोशी, धामारीच्या तलाठी अनुजा घुगे, केंदूरचे तलाठी रमेश घोडे यांनी याठिकाणी भेट देत नागरिकांची चौकशी करीत नुकसान झालेल्या लोकांची तात्पुरती व्यवस्था केली आहे.