शहर विरुद्ध जिल्हा असा रणसंग्राम उभा राहण्याची दाट शक्यता
लोणी काळभोर – पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व ग्रामीण भागातील हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील 66 हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या व सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या तीन तालुक्यातील तसेच सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतीला आगामी उन्हाळ्यात खूपच कमी पाणी मिळणार असल्याने पुणे शहर व उर्वरित भागात आगामी काळात पाण्यासाठी संघर्ष होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
यंदा पुणे शहर व जिल्ह्याच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. संपूर्ण हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात कमी पाऊस झाल्याची नोंद भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी शहरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मॉन्सूनच्या आगमनाला ज्याप्रमाणे उशीर झाला, त्याचप्रमाणे पावसाचा मोठा खंड होता.
यंदा महानगरपालिकेने केलेल्या पाण्याच्या अंदाजपत्रकात 70 लाख लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. 56 लाख लोकसंख्या शहराची गृहीत धरण्यात आली असून समाविष्ट 34 गावारतील लोकसंख्या 10 लाख धरण्यात आली आहे. तरल लोकसंख्या 4 लाख धरण्यात आली आहे.
या लोकसंख्ये नुसार 13.57 टीएमसी पाणी पिण्यासाठी लागणार आहे. शहरात पाणी वाटप करताना 7.33 टीएमसी पाण्याची गळती गृहीत धरून 20. 90 टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात शहर विरुद्ध जिल्हा असा रणसंग्राम उभा राहण्याची दाट शक्यता आहे.
तर प्यायलाही पाणी उरणार नाही
साडे अकरा टीएमसी पाणी मंजूर असताना महानगरपालिका तब्बल 15 टीएमसी पाणी जबरदस्तीने उचलत आहे. मग 24 टीएमसी पाणी महानगरपालिकेने उचलल्यास उर्वरित 2 टीएमसी पाणी हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्यासाठीही पुरणार नाही. त्यामुळे या तीन तालुक्यात 66000 हेक्टर शेती तर वाळवंटच होऊन जाईल.
पाणी योजना संकटात जातील
या तीनही तालुक्यातील कालव्याच्या कडेला बहुतेक ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या विहिरीतून पाणी उपसून गावांना पिण्यासाठी पुरविले जाते. कालव्याला पाणी असल्यानंतर या विहीरींना भरपूर पाणी असते. कालव्याला पाणी नसल्यास या सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी लक्षणीयरित्या कमी होते. त्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. कालव्याला जर महिन्यापेक्षा जास्त काळ पाणी नसल्यास बहुतेक विहीरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर असतात.