पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरत्या प्रवेशाची संधी दिली आहे. त्यासाठीचे परिपत्रकही प्रसिद्ध केले. मात्र, महाविद्यालयांमध्ये याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप “एनएसयूआय’ने केला आहे. त्या विरोधात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केले.
पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना “कॅरीऑन’ची संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काही अटींच्या अधीन पुढच्या वर्षात तात्पुरता प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रवेश नाकारत असल्याचा आरोप विद्यार्थी आणि “एनएसयूआय’ने केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि पुढील आठवडाभरात अंमलबजावणीचे आश्वासन दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न विद्यापीठाडून केला जात आहे. हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न वेठीस धरला जात आहे. विद्यापीठाने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस (मीडिया विभाग) अध्यक्ष अक्षय जैन यांनी केली आहे.