सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही
मंचर – आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील आदिवासी शेतकऱ्यांचे हिरडा पीक नुकसान भरपाईविषयी झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारच्या वतीने सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्याची माहिती किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.
राज्य सरकारने हिरडा नुकसान भरपाई विषयी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी, झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची किसान सभा व माकपच्या शिष्टमंडळांनी नुकतीच पुणे येथे भेट घेतली. यासंदर्भात सबंधित अधिकारी व संघटनेचे शिष्टमंडळ यांची एकत्रित बैठक गुरुवारी (दि. 19) मंत्रालय मुंबई येथे घेण्याचे मान्य केले आहे.
हा प्रश्न सोडवण्यासाठी व हिरडा नुकसान भरपाई विषयी झालेल्या, निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने नक्कीच सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. प्रा. अजित अभ्यंकर, किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे, अशोक पेकारी इत्यादी उपस्थित होते.
जून 2020 च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शेती पिकांचे, फळबागांचे,तसेच घरे व इतर घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झाले होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांतील शेतकरी बांधवांना याचा मोठा फटका बसला होता. याबरोबरच या तालुक्यांतील आदिवासी समाजाचे मुख् उत्पन्नाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळाचेही यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते आणि नुकसान भरपाईविषयी अहवाल सादर करण्यात आला होता. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान सभेच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.