खेड तालुक्यात जमीन, फ्लॅट, घर खरेदी-विक्री जोमात
राजगुरुनगर (प्रतिनिधी) – येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात आता घर, जमिनी खरेदीचे व्यवहार करण्यासाठी खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांची आणि त्यांच्या वकिलांची मंगळवारी (दि. 22) उच्चांकी गर्दी झाली होती. एकीकडे नागरिकांची गर्दी आणि दुसरीकडे “सर्व्हर डाऊन’ यामुळे अधिकारी आणि नागरिक पुरते वैतागले असून तासन्तास या कार्यालयात बसून राहावे लागले.
देशात कोविड 19 मुळे लॉकडाऊन झाले, त्यानंतर जमीन, घर खरेदीचे व्यवहार मंदावले होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी शासनाने काही नियम आणि अटी लावून शासकीय कार्यालयातील सर्व व्यवहार सुरळीत केले आहेत. त्यामुळे खेड तालुक्यात आता जमीन, घरे खरेदीच्या व्यवहारांना मोठी तेजी आली आहे. एकीकडे करोना संकटामुळे शेतकरी, घर मालक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अडचणीत आल्याने जमिनी, घरे विकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे तर दुसरीकडे काही गुंतवणूकदार आणि पैसा असलेल्या व्यक्ती खरेदी-विक्री करीत आहे. त्यातच राज्य शासनाने दस्त नोदंणी फी मध्ये कपात केल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यवहार सुरू झाले आहेत.
खेड तालुक्यात राजगुरूनगर येथे दोन तर चाकण येथे एक अशी तीन दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी कार्यालये गर्दीने फुलुन गेली आहेत. घरे, फ्लॅट, जमिनीची खरेदी खताचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने सध्या ही तीनही कार्यालये रात्रीपर्यंत सुरू असून आपला नंबर येण्यासाठी या कार्यालयात आणि कार्यालयापुढे मोठी गर्दी होत आहे.
राजगुरूनगर येथील तहसीलदार कार्यालयात मंगळवारी सकाळपासूनच या कार्यालयात नागरिकांनी रांगा लावल्या. टोकन पद्धतीने दस्त नोंदणी होत असते. मात्र, गेली अनेक दिवसांपासून दस्त नोंदणी “ऑनलाइन’ सेवा ठप्प होत असल्याने मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यातही अनेक जण वशिल्यावर नंबर लावत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. तालुक्यातील तीनही कार्यालये आता अपूर्ण पडू लागली आहेत. शासनाने येथील दस्त नोंदणी संख्या लक्षात घेता ऑनलाइन सर्व्हर सेवा दुरुस्त करावी. त्यातील अडथळे त्वरित दूर करण्याची मागणी वकिलांसह नागरिकांनी केली आहे.
आम्ही शासनाकडे सर्व्हर सुरळीत करून त्यामधील त्रुटी दूर करण्याची मागणी करीत आहे; मात्र ही सेवा वरूनच ठप्प होत असल्याने त्रासदायक होत आहे. दस्त नोंदणीला आलेल्या व्यक्ती सोशल डिस्टन्स पाळत नाहीत, त्यातील अनेकजण मास्क लावत नाहीत वारंवार सूचना व तोंडी सांगूनही कोविडचे नियम पाळत नाहीत. कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींनी मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे.
-संजय कातोरे, सहायक दुय्यम निबंधक
वशिल्यावर नोंदणीचा आरोप
सध्या करोनाचे मोठे संकट आहे मात्र ते बाजूला ठेवून नागरिकांनी सोशल डिस्टन्स न ठेवता या कार्यालयात मोठी गर्दी केली. जमीन, घरे खरेदीदार जामीनदार आणि त्याचे वकील यांची इतिहासात सर्वाधिक गर्दी मंगळवारी झाल्याने आणि सर्व्हर डाऊन झाल्याने वकिलासह दस्त नोंदणीला आलेल्या नागरिकांच्या रोषाला अधिकारी वर्गाला सामोरे जावे लागले. तर अनेकांनी वशिल्यावर नोंदणी होत असल्याचे आरोप केले.