वाल्ह्यातून लाकडी बांबूच्या परड्या विक्रीसाठी रवाना
वाल्हे – येथील बुरूड समाजातील काही कारागीर बांबूपासून विविध वस्तू तयार करून पूर्वापार सुरू असलेला पारंपरिक व्यवसाय जपून उदरनिर्वाह भागवित असतात. घटस्थापना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी लाकडी बांबूच्या परडीची निर्मिती वाल्हे (ता. पुरंदर) येथे झाली असून सध्या पुण्याच्या शहरी भागातील ग्राहकांसाठी परड्या पुण्याकडे रवाना करण्यात येत आहेत.
वाल्हे भागात मागील दोन-अडीच महिन्यांपासून “बुरुड’ समाजातील काही कारागीर कुटुंबासहित परडी बनवण्यासाठी उद्योगात गुंतले होते. पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये घटस्थापनेसाठी या परड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बांबूची पाती (पावक) काढून परडी बनवण्याचे काम मागील दोन-तीन महिन्यांपासून कारागीर करीत असतात.
घटस्थापना अवघ्या दोन दिवसांवरआहे. बनवलेला माल पुणे शहरात पाठवला जातो. व ठोक भावाने व्यापारी वर्गाला दिला जातो. सध्या पारंपरिक धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मिळणारा कच्चामाल, त्यापासून बनवली जाणारी वस्तू त्याला लागणारा वेळ व खर्च यांच्या खर्चाचा ताळमेळ बसत नाही; अशी खंत कारागीर भाऊ सपकाळ यांनी व्यक्त केली.
8 ते 10 हजार परड्या…
घटस्थापनेला फक्त दोन दिवस बाकी असून, आजपर्यंत जवळपास 8 ते 10 हजार परड्या पुणे शहरात विक्रीसाठी मालवाहतूक वाहनातून पाठविण्यात आल्या असून अजून काही माल पाठविण्यात येणार असल्याची माहिती परडी कारागीर, भाऊ सपकाळ, नरेंद्र सपकाळ, विनोद सपकाळ, ऋषिकेश सपकाळ, संतोष सपकाळ आदींनी दिली.
ठोक भाव 20 रुपये
वडील उपार्जित पारंपरिक व्यवसाय करण्याची आवड असल्यामुळे हा व्यवसाय करतो आहे. यासाठी लागणारा कच्चामाल सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून आणला जातो. सध्या बांबूंचा भाव वाढला असून 150 ते 200 रुपये प्रति नग असा आहे. बांबू वाहतुकीसाठी गाडी भाडे व त्यापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत याचा ताळमेळ बसत नाही. सध्या परडीचा ठोक भाव 20 रुपये मिळत आहे; परडीचा मिळत असलेला मोबदला तसा परवड नाही; मात्र पारंपरिक व्यवसाय म्हणून हे काम सुरू ठेवले; असल्याची नरेंद्र सपकाळ यांनी सांगितले.