राजगुरुनगर- पदरवाडी (भोरगिरी) येथे जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये तीन ते ४ फुटांनी वाढ झाली असून भूस्खलन होण्याचा धोका वाढत आहे. प्रशासनाकडून आतापर्यंत केवळ पुनर्वसनासाठी केवळ आश्वासने देण्यात येत आहेत. पावसाचे प्रमाण कमी असतानाही जमीन दिवसागणिक खचत असल्याने पदरवाडी ग्रामस्थांनी आज तहसीलदार प्रशांत बेडसे यांची भेट घेऊन भीमाशंकर परिसरात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी केली.
पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर खेड तालुक्यातील भिमाशंकर – भोरगिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या पदरवाडी येथे वस्तीच्या मागे जमीनीला जवळपास ३०० मीटर लांब भेग पडली आहे. दि २७ जुलै रोजी हि भेग पडल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाला कळवले. ईर्शाळवाडी येथील भुसख्खलन घटना ताजी असताना येथे जमिनीला भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते.
दरम्यानच्या काळात हि माहिती प्रशासनाला समजताच हालचाली सुरु झाल्या गटविकास अधिकारी यांनी (दि.८) ऑगष्ट रोजी पदरवाडी गावात जाऊन घटनास्थळी भेट देत शासनाकडे पुर्नवसनाची गरज असल्याचे सांगितले तसा अहवाल दिला. मात्र त्याच दिवशी भू वैज्ञानिक विभागाने या वस्तीत भेट देत पाहणी सर्वेक्षण करून धोका नसल्याचा प्रशासनाला अहवाल दिला आहे मात्र भू सर्वेक्षण झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सर्वेक्षणासाठी कोणीही या वाडीत भेट दिली नाही. शासन आमची दिशाभूल करीत आहे, असा आरोप खुद्द तहसीलदार बेडसे यांच्याशी चर्चा करताना ग्रासमथानी सांगितले. यावेळी भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड.सुरेश कौदरे, भोरगिरी चे सरपंच दत्तात्रय हिले, स्थानिक सामा काठे, सोमनाथ दिवाळे, अजय हांडे, दत्तात्रय डामसे, ज्ञानेश्वर काठे, रवींद्र डामसे, गणेश दिवाळे, गणेश हिले, सचिन हांडे,संजय हांडे, करण काठे आदी ग्रामस्थ युवक उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे म्हणाले, पदरवाडीचा भू सर्वेक्षण अहवाल आला आहे. पदरवाडीला धोका नाही तरीही पुनर्वसनासाठी प्रशासनाचा जमिनीचा शोध सुरू आहे. दुर्घटना होण्याआधी पुनर्वसन पूर्ण करू. पुनर्वसन करण्यासाठी जागा शोधत आहोत. येथील जमिनीला पडलेल्या भेगांची खोली वाढत असल्याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येईल तात्काळ निर्णय घेतला जाईल.
भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड.सुरेश कौदरे म्हणाले, दिवसेंदिवस जमिनीची भेग वाढत असताना येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाला शासनाने प्राधान्य दिले पाहिजे. जवळच खाजगी जागा आहे तिचे संपादन करावे. भीमाशंकर देवस्थानची जागा आहे मात्र त्याचा वाद कोर्टात सुरु आहे. देवस्थानच्या बाजूने निकाल लागला तर पदरवाडी साठी जागा दिली जाईल. दुसरा पर्याय भीमाशंकर येथे फॉरेस्ट जागा आहे ती पुनर्वसनासाठी मिळाली पाहिजे. पदरवाडीचा विषय अति संवेदनशिल विषय आहे. तत्परतेने निर्णय झाला पाहिजे.
भोरगिरी भीमाशंकर चे सरपंच दत्तात्रय हिले म्हणाले, पदरवाडी मध्ये २७ जुलैला ३० मीटर भेगा पडल्या. त्यावेळी त्याची खोली दीड दोन फूट होती. त्यावेळी पाऊस पडत होता. हीच भेग आज रोजी वाढून ४ ते ५ फूट खोल झाली आहे. प्रशासनाकडून कोणतीच हालचाल होत नाही. भूवैज्ञानिक वाडीत आलेच नाहीत त्यांनी शासनाला खोटा अहवाल सादर केला आहे. पाऊस नसतानाही भेग फाटत चालली आहे लवकरात लवकर पुनर्वसन होणे गरजेचे आहे.
प्रशिक्षणार्थी प्रांत डॉ. स्नेहा शिंदे म्हणाल्या, या परिसराची आम्ही पाहणी केली आहे. ग्रामस्थांनी तेथे खोदकाम करू नये अशा सूचना दिल्या आहेत. घरांचे सर्वेक्षण करून घेण्यात येईल. बांधकाम विभागाला तेथील भेग बुजविण्याचे सांगण्यात आले, मात्र भेग बुजवणे शक्य नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा अहवाल पाठवून जमिनीत पडलेली भेग वाढली असून त्याबाबत तात्काळ कारवाई होण्यासाठी अहवाल पाठविण्यात येईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस बी मुरकुटेम्हणाले, मी स्वतः पदरवाडीत जावून आलो आहे. खेडचे प्रांतअधिकारी यांच्या सोबत मीटिंग झाली. ती भेग मातीने भरण्याचे त्यांनी सांगितले मात्र जमिनीला खोलवर पडलेली भेग बुजवणे ही न पटणारी बाब आहे. हा त्यावर उपाय नाही. सध्या पाऊस थांबला आहे. भेग वाढत आहे. प्रशासनाने तात्काळ पुढील निर्णय घेणे योग्य राहील.
स्थानिक ग्रामस्थ रवी डामसे म्हणाले, याआधीही पदरवाडीत सर्वेक्षण झाले. मात्र प्रशासन कोणताही निर्णय घेत नाही. ३०० मीटर भेग खोली वाढत आहे. पहिली एक भेग होती आता सहा भेगा पडल्या आहेत. पावसाचा जोर वाढला तर धोका वाढणार आहे, आम्ही जीव मुठीत धरून राहत आहे.
स्थानिक ग्रामस्थ सामा काठे म्हणाले, दि.८ ऑगष्टला प्रशासनाने पाहणी केली. त्यावेळी भेग ३०० मीटर लांब होती आणि एक फूट खोल होती. आता हीच भेग ४ ते ५ फूट खोल झाली आहे. पाऊस नसताना भेग मोठी होत आहे. इरसाळवाडी सारखी दुर्घटना होण्याची भीती आहे. प्रशासनाने तात्काळ भूमिका घेत पुनर्वसन करावे. घटना घडल्यानंतर आठ दहा लाखाची मदत देण्यापूर्वी पुनर्वसन करा, अशी मागणी आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे म्हणाले, पदरवाडीचे ग्रामस्थ प्रांत अधिकाऱ्याना भेटायला ८० किमी खेड ला आले, मात्र त्यांना या ग्रामस्थांना भेटण्यासाठी वेळ नाही. येथील परिस्थिती धोकेदायक आहे. जमिनीला पडलेली भेग मोठी होत आहे. पाऊस नसतानाही भेग मोठी होत आहे म्हणजे पुढे धोका आहे. प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी. पाऊस नसतानाही भेगेची खोली वाढत आहे याबाबत पुन्हा भू सर्वेक्षण करावे.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले, पदरवाडी मध्ये भूसख्खलन धोका आहे. पाऊस नसतानाही भेग वाढत आहे, याबाबत मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत 23 ऑगस्ट मीटिंग झाली. पदरवाडीचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश खेड चे प्रांत यांना देण्यात आले आहेत.