घोडनदी काठावरील शेतकरी मेटाकुटीला
विशाल करंडे
लाखणगाव – आंबेगाव तालुक्याला जीवनवाहिनी ठरणाऱ्या घोडनदीच्या काठावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर विद्युत पंप बसवून त्याच्या साह्याने शेतकऱ्यांनी शेतात पाणी नेले आहे. त्यावर त्यांनी शेती बागायती केली आहे; परंतु नदीकाठच्या विद्युत मोटारी आणि त्या मोटारींच्या केबलची चोरी वारंवार होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असून, चोरीच्या घटनांमध्ये वाढच होत आहेत.
आंबेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या घोडनदीवर अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. घोडनदीवर असणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंभे धरणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होतो.
या माध्यमातून डिंभा डावा-उजवा कालवा व नदीला वर्षभर पाणी सोडले जाते. कालव्यांद्वारे येणाऱ्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना थेट शेतात करता येतो, त्यामुळे मोटारींची गरज भासत नाही; परंतु घोड नदीवर असणाऱ्या काठच्या शेतकऱ्यांना नदीवरील पाणी उपसासिंचन पद्धतीने उपसून शेतात न्यावे लागते. त्यासाठी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी विद्युत पंपबसवले आहेत.
नदीकाठी वस्ती नसणाऱ्या ठिकाणी हे विद्युत पंप असल्यामुळे चोरांना रात्रीच्यावेळी चोरीसाठी सोपे जाते. मागील दोन महिन्यांमध्ये काठापूर, जवळे, देवगाव, कळंब या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरच्या केबल चोरीला गेल्या आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये वारंवार होणाऱ्या या घटना शेतकऱ्यांसाठी तोट्याच्या ठरत आहेत.
सध्या एक केबल चोरीस गेली तर एका शेतकऱ्याचे अंदाजे 10 ते 15 हजार रुपयांचे नुकसान होते. मोटार चोरीस गेली तर 30 ते 40 हजार रुपयांचे नुकसान होते, त्यामुळे काठापूर बुद्रुकच्या ग्रामस्थांनी नदीकाठी मोटारी बसवलेल्या परिसरात सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असून, दोन सुरक्षारक्षक या ठिकाणची सुरक्षा, स्वच्छता, देखरेख दिवस रात्र करीत आहेत. येणाऱ्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी दरवर्षी प्रतिमोटार पाच ते सहा हजार अतिरिक्त खर्च येणार आहे; परंतु केबल किंवा मोटार चोरीच्या नुकसानीपेक्षा हा खर्च फायदेशीर ठरत आहे.
– हनुमंत थोरात, अध्यक्ष, घोडनदी पाणी व्यवस्थापन समिती,काठापूर बुद्रुक