श्रीनिवास पवार यांचा टोला ः सर्व कुटुंब शरद पवारांमागे राहण्याचा निणर्धार
काटेवाडी – शरद पवारांनी काय केले? याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही. ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले, 25 वर्षे मंत्री केले तरीसुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केले? असा काका मला लाभला असता तर मी खूश झालो असतो. ही सगळी भाजपची खेळी आहे. आरएसएसची पूर्वीपासूनची चाल आहे. त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं होतं, इतिहासाने हेच केले आहे, असे प्रतिपादन अजित पवार यांचे बंधू उद्योजक श्रीनिवास पवार यांनी केले.
काटेवाडी (ता. बारामती) येथे रविवारी (दि. 17) रात्री लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजक श्रीनिवास पवार, शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, भाऊसाहेब काटे, महादेव कचरे, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे, सतीश काटे, सुभाष वाघ, स्वप्नील काटे, प्रमोद काटे, आमिर मुलाणी, यांच्यासह काटेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीनिवास पवार म्हणाले, मी नेहमी लहान भाऊ म्हणून दादाला साथ दिली. आमदारकीला तू आहेस, साहेबांचं वय 83 झालं आहे. साहेबांचे आपल्यावर किती उपकार आहेत, खासदारकीला साहेबांच्या मागे उभे राहू. त्यांना सोडणे हे मला पटलं नाही. माझे काही मित्र मला म्हणाले, यापुढे दादांचे युग आहे. हा विचार मला वेदना देऊन गेला.
आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळे आपल्यालाच दिले. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नसतं. आपल्याला जी पद मिळाली ती साहेबांमुळेच आणि त्याच साहेबांना म्हणायचं आता घरी बसा. मी जरा वेगळा माणूस आहे. मला जे पटत नाही ते मी करत नाही. माझे शाळेतील मित्र देखील मला न सांगता गेले. औषधाला एक्सपायरी डेट असते त्याप्रमाणे एक्सपायरी झाले म्हणायचे व पुढे चालत राहायचे मला नाही वाटत त्यांना तिकडे झोप येत असेल.
अजित पवार यांचे नाव न घेता श्रीनिवास पवार म्हणाले, घरातला कोणी फुटला तर घर संपते. घर एक असेल तर संपू शकत नाही साहेबांना एकुलती एक मुलगी आहे त्यांना काय वाटत असेल. साहेब दहा वर्षे मागे असते तर त्यांनी काय केले असते हे तुम्हाला माहित आहे. वयस्कर माणसाला कमजोर समजू नका, त्यांच्याबरोबर केवळ लाभार्थी आहेत. वयस्कर माणसांना माहिती आहे, साहेबांनी काय केलं आहे. साहेबांनी मधल्या काळात 25 ते 30 वर्षे दुसर्यांवर सोपवलं होतं. मी दिल्लीत आहे तुम्ही राज्यातील बघा म्हणून ही वेळ आली आहे.
बारामती ही शरद पवारांचीच!
गेली साठ वर्षे शरद पवार हे राजकारणात असल्याने त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केले, याचे महत्त्व आपल्याला कळत नाही, तर कोणाला कळणार? ते शरद पवार आहेत. पुढील शंभर वर्षे तरी बारामती ही शरद पवारांचीच म्हणून ओळखली जाणार आहे. तुम्हाला एकटे पाडले असा आरोप केला जात आहे; परंतु तुम्ही वेगळा निर्णय घेतला म्हणून तुम्ही कुटुंबापासून दुरावला आहे. कुटुंबातील बाकी घरातील काय वेडे आहेत का? असाही सवाल यावेळी श्रीनिवास पवार यांनी केला.