भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा इशारा
अकलूज (वार्ताहर) – पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात आहेत. त्यातच शेती पंपासाठी फक्त दोन तास वीज सोडून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा वीजबिल वसुलीचा तगादा लावला आहे. राज्यसरकारने महावितरणने शेती पंपाची वीज पूर्ववत करत शेतकऱ्यांचे आर्थिक मानसिक खच्चीकरण थांबवावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
शेतकरी बांधव हा करोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्टया कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करत महावितरणकडून वीजतोडणी मोहीम राबवली आहे. त्यामुळे महावितरण व महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना अधिकचा मनस्ताप भोगावा लागत आहे.
महाविकास आघाडी सरकारने सक्तीने वीज बिल वसूली व वीज तोडणी करून सोलापूर जिल्ह्यातील शेतक-याला वेठीस धरून नये राज्य सरकारने शेतक-यांची आर्थिक मानसिक पिळवणूक तात्काळ थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला.