ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीने नांगरणी
चालकांना ट्रॅक्टर घरीच उभे करण्याची वेळ
समीर भुजबळ
वाल्हे – रब्बी हंगाम संपल्यानंतर बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. अशातच डीझेलच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर बळीराजा ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीच्या साह्याने नांगरणीचे काम करीत आहे.
एकीकडे शेतकरी बैलजोडीने नांगरणी करताना शेतात व्यस्त आहे, तर दुसरीकडे डीझेल भाववाढीचा फटका ट्रॅक्टर चालकांना बसल्याने, ट्रॅक्टरची नांगरणी एकरी साडेतीन ते चार हजार रूपये केल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरने नांगरणीचा परवडत नसल्याने शेतकरी आपल्या सर्जा-राजाने नांगरणी करीत असल्याने, ट्रॅक्टर चालकांना ट्रॅक्टर घरी उभे करण्याची वेळ आली आहे.
कमीवेळात जास्त काम आणि जलद गतीने काम व्हावे म्हणून अनेक शेतकरी ट्रॅक्टरने खरीपची नांगरणी करतात; मात्र साडेतीन-चार हजार रूपये देऊन ट्रॅक्टरने नांगरणी शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी बैलजोडीने आणि विशेष म्हणजे लोखंडी नागराने नांगरणी करीत आहे. शेतीत मनुष्यबळ मिळत नसल्याने शेतीचे बहुतांश कामे ट्रॅक्टरच्या मदतीने केल्या जात होती. मनुष्यबळ या व्यतीरिक्त वेळेचीही बचत शेतकऱ्यांना होत असे; मात्र आता डीझेलचे भाव वाढल्याने बळीराजा पुन्हा पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहायाने मशागतीच्या कामाला लागला आहे.
… तर शेती पिकवणे खडतर
रखरखत्या उन्हात अंगाची “लाही लाही’ होत असतानाच बैलजोडीच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामास सुरुवात केली आहे. एकंदर इंधन दरवाढीचा फटका बळीराजासह ट्रॅक्टर मालकांना बसला आहे. भविष्यात अशीच इंधन दरवाढ होत राहिली तर शेती पिकवणे खडतर होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
एकरी 500 ते 1 हजार रुपये दरवाढ
मागच्या वर्षी डीझेल 87 रुपये लिटर असल्याने नांगरणीचे एकरी भाव 3 हजार रुपयेपर्यंत होते; मात्र यावर्षी डीझेलचे भाव 104 रूपये 86 पैसे एवढे झाल्याने ट्रॅक्टर मालकांनी तीन हजार रुपयांवरून थेट साडेतीन ते चार हजार रुपये एकरी नांगरणीचे भाववाढ केली, त्यामुळे शेतकऱ्यांना नांगरणीचे भाव परवडत नसल्याने पुन्हा मशागतीची कामे बैलजोडीने केल्या जात आहे.