सध्या तापमानाचा पारा आता चढत आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य आणि स्वास्थ्याबद्दल अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. जे विचार न करता खान-पान करतात, त्यांच्या आरोग्याला या मोसमात आव्हान निर्माण होतं. सर्वसाधारणपणे दाह आणि पित्त असे त्रास प्रामुख्याने उन्हाळ्यात होतात. छातीत जळजळ, मुखदुर्गंधी, तोंड येणं आणि दाह. शरीरात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा आपलं शरीर उच्चतम पातळीवर आम्लनिर्मिती करतं. अशावेळी अन्नच तुमचे औषध ठरू शकते.
पाणी आणि द्रवपदार्थ – शरीरातील पाणी आणि पीएच पातळी सुयोग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, थंड दूध, ताक आदी द्रवपदार्थ जास्त घेणे महत्त्वाचे आहे. शहाळ्यामुळे नैसर्गिक पद्धतीने मूत्रविसर्जनाचे प्रमाण वाढते. यात पोटॅशियम आणि खनिजांचा मोठया प्रमाणावर असल्यामुळे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
थंड दूध – आहारात थंड दुधाच्या समावेशाने, पोटातील अतिरिक्त आम्ल शोषले जाते. थंड दुधात 1 चमचा सब्जा टक्कल्यास ते पित्तासाठी अतिशय उपायकारक ठरते.
दही आणि ताक – उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून प्रामुख्याने हे पदार्थ सुचवले जातातच. या दोन्ही घटकांमध्ये प्रोबायोटिक्स उत्तम प्रमाणात असल्याचे सर्वज्ञात आहे. पोटाचे संरक्षण आणि पचनक्रिया सुधारण्यास यामुळे मदत होते.
विविध फळे – फळं नैसर्गिक स्तरावर अँटीऑक्सिडंट आहेतच. शिवाय भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे ती ऊर्जा निर्मितीही करतात. पाण्याचा समावेश, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरयुक्त फळे सर्वोत्तम ठरतात आणि खास करून उन्हाळ्यात त्यांचा चांगलाच फायदा होतो. यामुळे फळांचा रस घेण्यापेक्षा उत्तम रसाळ फळ खावे.
आवळा, पेरू, संत्रा आणि लिंबू यासारखी फळे जीवनसत्वयुक्त आहेत. थोडीशी आंबट असल्याने, अनेकांना या फळांमुळे पित्त वाढेल, अशी भीती वाटते. परंतु, जीवनसत्वयुक्त असलेली ही फळे पित्तासाठी परिणामकारक ठरतात. शिवाय यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आंब्यासारखी उन्हाळ्यात मिळणारी फळेही जीवनसत्त्वाने परिपूर्ण आहेत. ताडगोळा, जाम, खरबूज, कलिंगड ही फळेसुद्धा पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत. या फळांमुळे शरीरात पाण्याची पातळी राखली जाते.
केळी हे फळ पित्तावर औषध म्हणून सर्वसाधारणपणे घरगुती उपायांमध्ये वापरले जाते. उत्तम फायबरच्या समावेशामुळे केळे पित्तमारक ठरते. मोसमी फळे तसेच विविध रंगांची फळे खावीत, असे आम्ही सुचवतो. यामुळे नैसर्गिकस्तरावर अँटीऑक्सिडंटचे फायदे मिळतात आणि शरीराची ऊर्जा क्षमताही वाढीस लागते.
भाज्या – दुधी, पडवळ, भोपळा, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या त्यांच्यातील पाण्याचा आणि खनिजांच्या अंशामुळे फायदेशीर ठरतात. शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी काकडी खासकरून उपयुक्त ठरते. सिमला मिरचीमुळेही नैसर्गिक स्तरावर पोटातील आम्लावर परिणाम होतो. उन्हाळ्यात खास करून वैविध्यपूर्ण सलाड आणि भाज्यांचे गार सूप अशा पदार्थाचा आहारात समावेश करावा.
गूळ – गूळ या मोसमासाठी चांगला असतो. गुळाचे पाणी तुमच्या पित्तावर आणि पित्ताच्या लक्षणांवर अतिशय परिणामकारक ठरते. चिमूटभर मीठ घातलेले, तुळशीची पाने असलेलं लिंबूपाणी घोट घोट घेत राहणं, ताजा ऊस खाणं यामुळेही शरीरातील वाढलेले तापमान कमी होत. चहा, कॉफी, मद्य, सोडा इत्यादींच्या अतिरिक्त सेवनामुळे पित्त वाढते आणि दाहसुद्धा होतो. लाल आणि हिरवी मिरची, मिरी यासारखे मसाले, पुदिना आणि चॉकलेट यामुळेही शरीरात आम्लनिर्मिती होते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्या जोडीला अतीगार पाणी पिणे, उन्हाळा आहे म्हणून रात्री अमर्याद जागरण करणे अथवा बाहेरचे मनसोक्त खाणे या गोष्टीही टाळल्या पाहिजेत. तरच पित्त प्रवृत्ती उफाळून येणार नाहीत.