इंद्रायणी प्रदूषण मुक्त होऊ दे : भाविकांचे माऊलींना साकडे
आळंदी – इंद्रायणी स्नानाशिवाय वारी पूर्ण होत नाही अशी वारकरी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कार्तिकी वारीला आलेले लाखो वारकर्यांनी पवित्र इंद्रायणीत स्नान केले. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील केमिकल कंपन्यांचे प्रदूषित पाणी थेट इंद्रायणीत सोडल्याने पवित्र इंद्रायणी केमिकलच्या पाण्यामुळे फेसळलेली असते मात्र यात्रेनिमित्त धरणातून जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला. गेली चार दिवसांपासून इंद्रायणी तीर भाविकांनी गजबजलेला आहे. दरम्यान, इंद्रायणी प्रदूषण मुक्त होऊ दे, असे साकडे भाविकांनी माऊलींना घातले.
विश्व शांती केंद्र येथे भजन, कीर्तन आदी वारकरी संप्रदायिक कीर्तन सुरु असल्याने भाविक भाविकांची घाटावर मोठी गर्दी होती. एकादशीच्या दिवशी वारकरी नगर प्रदक्षिणा घालून इंद्रायणीवर पोहोचतो होते. इंद्रायणी तिरावर जिकडे तिकडे हरीनामाचा गजर आणि उंच उंच भगव्या पताका दिसत होत्या. वारीला आलेले भाविक हा अलौकिक सोहळा आपल्या डोळ्यांत साठवत होते.
वासुदेव गोड अभंग गात भाविकांना त्यांच्या आजोबांचे नाव विचारून त्यावरून पारंपरिक वासुदेव पद्धतीने गात होते. आलेल्या भाविकांना गंध लावण्यासाठी गंध लावणार्यांची दिवसभर लगबग होती. अनेक भाविक आळंदी वारीचे हे क्षण आपल्या मोबाइल कॅमेर्यात कैद करत होते. वारकरी फड परंपरेच्या दिंड्याचे भजन, विविध खेळ पाहून भाविक भारावून जात होते.
इंद्रायणी घाटावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इंद्रायणीत कोणी भाविक बुडून दुर्घटना घडू नये यासाठी इंद्रायणीत प्रशासनाकडून रेस्न्यू बोटी तैनात होत्या. दर्शनबारी इंद्रायणी घाटाच्या पलीकडील दर्शन मंडप पूर्ण भरून पुढे गेली होती. इंद्रायणी घाटावरून दर्शनबारी असल्याने भाविक माऊलींच्या दर्शनाआधी घाटावरील हा सर्व सुखसोहळा पाहून पूर्ण पावलो अशा अवस्थेत होते. अबाल वृद्ध भाविक देहभान विसरून माऊली नामात तल्लीन होत होते.