आळंदी -शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पाडून घेण्यासाठी 16 इमारत मालकांना पालिकेने नोटीस दिल्या आहेत. बांधकाम पाडून घेण्यास विलंब केला तर फौजदारी कारवाईस पात्र केले जाणार आहेत. त्यामुळे एका मालकाने इमारत पाडण्यास सुरुवात केली मात्र, पाडताना कोणतीही सुरक्षात्मक यंत्रणा उभी न केल्याने पालिकेने ते काम बुधवारी (दि. 7) थांबवले आहे.
आळंदी पालिकेचे बांधकाम विभागप्रमुख संघपाल गायकवाड म्हणाले की, शहरातील मोडकळीस आलेल्या आणि जुनाट मातीच्या बांधकामास धोकादायक इमारत म्हणून पालिकेने सर्वेक्षण करून निश्चित केल्या आहेत. धोकादायक इमारती जागा मालकांनी स्वतःहून पाडून घेण्याबाबतचे जाहीर प्रसिद्धीकरण व नोटीसही जून महिन्यात पालिकेने संबंधित इमारत मालकांना दिल्या होत्या.
त्यापैकी महाद्वारातील एका व्यापाऱ्याने नोटीस आल्यानंतर तीनमजली धोकादायक बांधकाम स्वतःहून पाडण्यास सुरुवात केली. मात्र, या इमारतीचा राडारोडा रस्त्यावर पडत होता. त्यामुळे वाहतुकीस व नागरिकांना ये जा करण्यास अडथळा होत होता. संबंधित इमारत मालकाने अपघात होऊ नये व जीवितहानी होऊ नये, यासाठी कोणत्याही सुरक्षात्मक यंत्रणा उभी केली नव्हती.
त्यातून अपघातही होण्याचा संभव होता. याची दखल घेत पालिकेने काम थांबवले तसेच, लवकरात लवकर सुरक्षात्मक यंत्रणा उभारून बांधकाम पाडावे, अन्यथा कारवाईस पात्र केले जाईल, अशी तंबीही देण्यात आली आहे.