रेडा -इंदापूर तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. यामुळे ओढे, नदी, नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात तसेच शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे सरकारने आला दुष्काळ जाहीर करावा, तसेच उपययोजना राबवाव्यात, अन्यथा अन्यथा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या आदेशाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, या आशयाचे निवेदन महायुतीच्यावतीने करण्यात आली आहे.
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप व महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी इंदापूर तहसीलदारांना शनिवारी (दि. 19) निवेदन दिले आहे. यावेळीनायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनावर इंदापूर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, जिल्हा सचिव तानाजी थोरात, शिवाजी तरंगे,किसान मोर्चाचे संघटक माउली चवरे, मारुती वनवे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, मागासवर्गीय आघाडीचे उपाध्यक्ष नानासाहेब शेंडे आदि पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी अतीवृष्टीमुळे शेतजमिनी खचल्या असून शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेली आहे. पिकांमध्ये पाणी साचले आहे. अतिरिक्त पाण्यामुळे डाळींब, द्राक्ष, केळी, पेरू आदी फळबागा तसेच ऊस, मका, आदी पिके आणि मका, कडवळ चारा पिकांचे नुकसान झाले आहे. पशुधन तसेच दुग्ध व्यवसाय धोक्यात आलेला आहे. अतीवृष्टीमुळे जिथे जिथे पिकांचे, घरांचे, शेतजमिनीचे नुकसान झाले आहे, तेथील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करावी.