भुसख्खलनाचे सावट कायम : प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचेच गाजर
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील पदरवाडीमध्ये भूसख्खलन होण्याची भीती वाढली असताना प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून ठोस भूमिका घेतली जात नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पदरवाडी गावातील ग्रामस्थांनी सोमवारपासून (दि. 11) खेड तहसीलदार कार्यालयापुढे प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे.
पदरवाडी ही जेमतेम 16 ते 20 घरांची वस्ती वाडी आहे. या वाडीच्या मागील भाग सपाट असून त्या खाली मोठा कडा आहे. वाडीच्या मागे असलेला भाग यावर्षीच्या पावसात सुमारे सहा ते फूट खोल आणि सुमारे 500 मीटर लांबीच्या भेगा पडून भूसख्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षी प्रशासनाकडून येथे जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगेची पाहणी करण्यात आली; मात्र तयार कोणतीच ठोस भूमिका निर्णय प्रशासनाने घेतला नाही.
पदरवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडून ठोस भूमिका घ्यावी. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व 16 कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी आज सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून खेड तहसीलदार कार्यालयापुढे बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली पदरवाडीचे सामा काठे, कुंडलिक हांडे, कैलास काठे यांच्यासह सोनाली डामसे, यमुनाबाई हिले या पाच ग्रामस्थानी आमरण उपोषण सुरू केले आहे.
आमरण उपोषणाच्या पाहिल्या दिवशी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, संचालक सुधीर भोमाळे, पदरवाडी(भोरगिरी) ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय हिले, बिरसा ब्रिग्रेडचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी, खेड तालुका अध्यक्ष एकनाथ तळपे, संतोष भांगे, संतोष सुपे,नामदेव गवारी, तानाजी भोकटे, बाळू मदगे, शंकर मोरमारे, सोमनाथ दिवाळे,रामचंद्र हिले, ज्ञानेश्वर काठे, करण काठे, मनोज काठे, संजय हांडे, अरुण दिवाळे, सचिन हांडे, दिलीप डामसे, दत्तात्रय डामसे, आकाश दिवाळे, रवींद्र डामसे, तान्हाजी मुर्हे, कुणाल नागरे आदी उपस्थित होते.
दरड कोसळून मरण्यापेक्षा…
शासन आमचे पुनर्वसन करण्याबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार. दरड कोसळून मरण्यापेक्षा आमरण उपोषण करू अशा शब्दात शासनाला आर्त हाक देत ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.