सर्जा-राजाला आंघोळ घालण्यासाठीही बंधारे, धरणात पाणीच नाही
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. पावसाळ्यात पावसाने म्हणावी तशी जोरदार हजेरी लावली नाही. त्यात पुन्हा काहीशी रिमझिम हजेरी लावून पावसाने पाठ फिरविलेलीच आहे.
यामुळे ओढे, नद्या, नाले, पाझर तलाव, बंधारे, विहीरी अद्याप पाण्यावाचून कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा बैलपोळा सण जवळ आला आहे. शनिवारी (दि. 14) सर्जा-राजाला आंघोळ घालण्यासाठी, खांदेमळणीला ओढे-नाले, बंधारे, विहिरी पाण्यावाचून कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे, पाण्याच्या शोधात पशुपालकांना भटकंती करावी लागणार आहे.
वाल्हे परिसरात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातच ओढे-नाले, बंधारे भरले होते. मागील वर्षी गणपती विसर्जन करण्यासाठीही सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यावर्षी वाल्हे व परिसरातील अनेकांना 8 ते 9 किलोमीटर अंतरावरील नीरा नदीच्या कालव्यावर तसेच काहींना निरा नदीवर गणपती विसर्जनास जावे लागले होते.
मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टीने अनेकांची पिके पाण्यातच सडून गेली होती. सर्वञ पाणीच-पाणी होते. यामुळे वाल्हे व परिसरातील सर्वच पशुपालकांनी बैल पोळा सणाला बैल, गायी, म्हैस आदी पाळीव जनावरांना अंघोळ घालण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. मात्र, यावर्षी उलट परिस्थितीत निर्माण झाली असून, ओढे- नाले, बंधारे, तलव, विहीरी अद्याप कोरडेठाक पडले असून, पशुधनास पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, अशा परिस्थितीत वर्षातून एकदा येणारा पारंपरिक सण साजरा करायचा तरी कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
हलका फुलका तरी साजरा करणारच
जरी दुष्काळाचे सावट असले तरी, पोळा सण बळीराजासाठी सर्वांत महत्त्वाचा सण समजला जातो. अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक अन् लोकसंस्कृतीचा वारसा असलेला हा सण, दुष्काळसदृश परिस्थितीत, हलका फुलका तरी सण साजरा करणारच, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.