इंद्रायणीनगर – भोसरी परिसरात विविध नामांकित बॅंकांची एटीएम सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे रोख रक्कम काढण्यासाठी बॅंकेत जाऊन वाया जाणारा वेळ व आर्थिक भुर्दंड यापासून भोसरीकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. बॅंकेच्या विश्वासहर्तेवर नागरिकांनी आपली आयुष्याची जमा पुंजी सुरक्षित राहवी म्हणून बॅंकेत ठेवली असली तरी दुसरीकडे मात्र एटीएम केंद्रांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दै. प्रभातच्या पाहणीत दिसून आले.
भोसरी परिसरातील राजमाता उड्डाणपूल परिसर, दिघी रस्ता, आळंदी रस्ता तसेच रहादारीच्या रस्त्यांवर गल्लीबोळात असणारे एटीएम सुरक्षा रक्षकाविना दिसून आले. एवढेच नाही तर दिघी परिसरातील दत्तनगर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ते छत्रपती संभाजी महाराज चौक, भारतमातानगर, दिघी आळंदी रस्त्यावरील एटीएम केंद्रांची पाहणी करण्यात आली. तेव्हा दिघी परिसरातील एकाही ठिकाणी सुरक्षारक्षक आढळून आला नाही. सर्व एटीएम केंद्र ही बेवारस स्थितीत सुरू होती. बऱ्याच केंद्रात आत जाऊन पाहणी केली असता कागदाचा कचरा पडलेला, तर कुठे वातानुकूलीत यंत्रणा बंद पडलेली दिसली. तर काही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामी असल्याचे निदर्शनास आले. निर्जन व निर्मनुष्य ठिकाणी माणसांची उठ बस दिसून आली. यापूर्वी शहरांत घडलेल्या एटीएम फोडीच्या वाढत्या घटना वाढीस लागल्या असल्या तरी संबंधित बॅंकेने सुरक्षा घेणे गरजेचे असताना अशा ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक केलेली दिसली नाही. यामुळे एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून आले.
सहकारी बॅंकांकडून सुरक्षा चोख
भोसरी, दिघी परिसराची संपूर्ण पाहणी केली असता असे निदर्शनास आले की सरकारी बॅंकांच्या एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक असल्याचे दिसून आले. रात्री सुद्धा सुरक्षारक्षक चोख बंदोबस्त देताना दिसत होते. अनोळखी व्यक्तींची तसेच संशयास्पद व्यक्तींची विचारपूस करताना सुरक्षारक्षक आपली जबाबदारीर पार पडताना दिसले. मात्र सरकारी बॅंकेच्या एटीएमची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून आले.
भटक्या कुत्र्यांचा वावर
रहिवासी भाग नसलेल्या ठिकाणच्या एटीएमला ऍटोमॅटीक दरवाजे नसले तर त्याठिकाणी मोकाट जनावरे, कुत्री यांचा वावर दिसून येत आहे. बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी एखाद्या व्यक्तीला एटीएममधून पैसे काढायचे असतील आणि तेथे कुत्रे दिसून आली तर तो ग्राहक दुसऱ्या ठिकाणी जातो. त्यामुळे संबंधित बॅंक व एटीएमची देखभाल घेतलेल्या एजन्सीने त्याठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.