आळंदीतील प्रकारामुळे नागरिक संतप्त
आळंदी – सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाने गतवर्षीपासून ग्राहकांना आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
यंदा मात्र दिवाळीचा शिधा आणि दर महिन्याचे मोफत धान्य अशा दुहेरी पद्धतीने शिधा देण्याचे काम गेली चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे; मात्र यंदा आनंदाचा शिधा याची पावती तसेच दरमहा दिले जाणारे धान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ या दोन्हीची पावती वेगवेगळी करण्याची शासनाची योजना आहे. त्यामुळे ग्राहकांना चार चार तास भरउन्हात थांबावे लागते. शासनाने स्वस्त धान्य दुकानदाराकडे जी मशीन दिली आहे,
ती मंद गतीने चालत असून, एका ग्राहकासाठी वीस मिनिटांचा अवधी पावती काढण्यासाठी लागतो. त्यामुळे एका ग्राहकाचा अर्धा तास निघून जातो. यामुळे रांग वाढत जाते.
सकाळी आठपासून माऊली मंदिरा समोरील एका स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांची रांग लागली होती, त्यांना बारापर्यंत धान्य मिळाले नाही. ही स्वस्ताची व दिशाभूल करणारी योजना शासनाने बंद करून आम्हा सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरू नये, अशी मागणी असंतप्त ग्राहकांनी केली आहे.