महिन्यापासून लाखो लिटर पाणी वाया प्रशासनाचा कारभार बेभरवशाचा
वाल्हे – वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन मागील एक महिन्यांपासून फुटली आहे. केवळ प्रशासनांच्या दुर्लक्षिततेमुळे हजारो लिटर पाणी मागील एक महिन्यांपासून वाया जात आहे.
वाल्हे ग्रामपंचायतीचा कारभार जून 2023 पासून प्रशासक पाहत आहेत. नुकतेच वाल्हे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. अद्यापपर्यंत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच विराजमान झाले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणी निर्माण होत आहे. सामान्य अडचणी सोडविण्यात प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतली जात नसल्याची तक्रार गुरुवार (दि.9) ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा घेऊन आलेल्या महिलावर्गानी व्यक्त केली होती.
वाल्हे परिसरातील नागरिकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मागील एक महिन्यांपासून माळवाडी, बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणीच येत नसल्याने महिलांनी ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आक्रमक पावित्रा घेत थेट ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता.
एकीकडे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची पाइपलाइनला मागील एक महिन्यांपासून गळती लागून हजारो लिटर पाणी वायाला जात आहे. दुसरीकडे गावातील नागरिक मागील एक महिन्यांपासून पाण्यावाचून वंचित राहिल्याने महिलांनी आक्रमक पावित्रा घेत हंडा मोर्चा काढून जाब विचारला होता.
तालुक्यात यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने सर्वत्रच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे वाल्हे ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
विषेश म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पाइपलाइनला एक महिन्यांपासून लिकेज होत आहे. रस्त्यावर पाण्याचे डबके साचून राहून चिखल होत आहे. तरी देखील संबंधित प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांकडून प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य हे विराजमान झाल्यावर प्रथम गावाला भेडसावत असलेला पाणीप्रश्न निकाली काढणार आहोत.
-अतुल गायकवाड,
नवनिर्वाचित सरपंच, वाल्हे.