चाकण – लोकशाही मजबूत करण्यासाठी विचारांची व एकसंघ होऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. गद्दारांनी शिवसेना संपविण्याचा कट रचला; मात्र निष्ठावंत शिवसैनिकाच्या सहकार्याने व जनतेच्या न्यायालयात याचा निवाडा होईल, असे मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्यांच्या चाकण (ता. खेड) येथील बैठकीत अहिर बोलत होते. यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, बाबाजी काळे, अमोल पवार, अशोक खांडेभराड, विजया शिंदे, बाळासाहेब ताये, अनिता झुंजूम, विजया जाधव, उत्तम गोगावले, पांडुरंग गोरे, रामहरी आवटे, संजय घनवट आदी उपस्थित होते.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी पहिले कारसेवक शिवसैनिक होते. याचा विसर मंदिर बांधणार्यांना पडला असल्याची खंत अहिर यांनी व्यक्त केली. राजकीय स्वार्थासाठी दिखावा जास्त होत असल्याचे सांगून अहिर यांनी संभाव्य निवडणुकीत जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले. यावेळी अशोक खांडेभराड रामदास धनवटे, सुरेश भोर, सुलभा उबाळे, शिवाजी शिंदे, बाबाजी काळे, अमोल पवार आदींची भाषणे झाली.