जेजुरी : पुरंदर तालुक्यामध्ये जून महिना संपत आला तरी यंदा वळीव पडला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले.शेतातील ढेकळे सुद्धा फुटली नाहीत. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने खरीप हंगाम लांबला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे पुरंदरचे अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
उत्तर पूर्व पुरंदर तालुक्याची संजीवनी समजल्या जाणाऱ्या, 788 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या जेजुरीनजिक नाझरे (मल्हारसागर) जलाशयात केवळ 212 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी 200 दशलक्ष घनफूट हा मृत साठा समजला जातो. या जलाशयावर अवलंबून असलेल्या जेजुरी शहर व औद्योगिक वसाहतीसह नाझरे 5 गावे, पारगाव माळशिरससह 23 गावे, मोरगावसह इतर 16 गावे आदी शहर गाव- वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठ्यासाठी केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. ओढे कोरडेठाक पडले आहेत.काही ठिकाणी तर विंधन विहिरी बंद पडल्या आहेत. पुरंदर तालुक्याचा खरीप हंगाम म्हणजे बाजरी, भुईमूग, वाटाणा, मूग, घेवडा आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. यंदा पेरणीच लांबल्याने उत्पन्न घटते की काय, अशी भीती आहे. सीताफळाच्या बागांवरही परिणाम झाला असून बहरात येणारे फुल गळत आहे.
व्यापारपेठेवर परिणाम
आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुरंदर तालुक्यामधून गेल्या आठवड्यात माऊलींसह इतर संतांच्या पालख्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. वैष्णवांच्या गर्दीमुळे बाजारपेठेतील दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.त्यानंतर मात्र पाऊस लांबला तसे व्यापार-बाजारपेठेवरही परिणाम जाणवत आहे. जेजुरी येथील गुरुवारच्या आठवडे बाजारात तुलनेने गर्दी नागरिकांची गर्दी कमी होती.