प्रशासनाचे दुर्लक्ष : …अन्यथा गांधीगिरी मार्गाने आंदोलन
शेलपिंपळगाव – चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावर मोठमोठे धोकादायक खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहेत. रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसंदर्भात नागरिकांकडून वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी वाहतुकीदरम्यान रस्त्यावरील दुचाकीस्वारांना तसेच मोठ्या वाहनांना समस्यांचा सामना करत मार्ग काढावा लागत आहे.
हा मार्ग पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडणारा मार्ग आहे. मुंबईहून अहमदनगरकडे ये-जा करणार्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने वाहनचालक याच मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परिणामी राज्य महामार्गावर वाहनांची वर्दळ कमालीची वाढू लागली आहे. मात्र, रस्त्यावर बहुतांश ठिकाणी जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे.
शेलपिंपळगाव, बहुळ, चौफुला, साबळेवाडी, शेलगाव आदी ठिकाणी भर रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून काही खड्ड्यांमधून पाण्याचा निचरा होत आहे. परिणामी रात्रीच्या वेळी या पडलेल्या खड्ड्यांभोवती रस्ता निसरडा होत आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला खड्ड्यांचा तसेच पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने घसरून पडल्याच्या अनेक घटना वाढत आहेत.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याच्या समस्या मार्गी लावाव्यात अन्यथा गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुधीर मुंगसे, प्रकाश वाडेकर, संतोष आवटे, बाप्पू थिटे, अमोल इंगळे, धनंजय पठारे, केतन दौंडकर, राहुल आवटे, प्रीतम आवटे, विशाल पोतले, मंगेश आल्हाट, प्रवीण हांडे आदींसह वाहतूकदारांनी दिला आहे..
राज्य महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे बुजविण्याचे काम रस्ता दुरुस्ती विभागाने यापूर्वी केले आहे. परंतु खड्ड्यांमध्ये मुरूम किंवा फक्त ठिगळे लावून हे खड्डे बुजविले होते. अद्याप कधीही रस्त्यावर पडलेल्या खडड्ड्यांना डांबर टाकून बुजविले नसल्याने हे खड्डे रौद्ररूप धारण करत आहेत.
– शरद मोहिते, सरपंच, शेलपिंपळगाव
सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त दर्जाहीन मलमपट्टी करत त्यामुळे शेलगाव परिसरात मोठे खड्डे पडले आहेत… हे खड्डे हुकवताना अपघातही झाले आहेत.. कधीकधी स्थानिक गावातील नागरिक पुढाकार घेऊन स्वखचार्तून हे खड्डे बुजवत आहेत
– विशाल झरेकर, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेड