पुणे – राज्यात खरीप हंगामात सरकारने घोषित करण्यात आलेल्या १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांच्या दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारपासून (दि.१२) राज्याच्या दौरा करणार आहे. पुणे येथील विधानभवन येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय पथक आणि राज्य शासनाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे. त्यानंतर हे पथक पुणे विभागातील जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांत चार स्वतंत्र पथकाद्वारे मंगळवारपासून पाहणी दौरा सुरू करणार आहेत. प्रत्येक पथकामध्ये राज्याचा एक अधिकारी समन्वयक नेमून दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा पूर्ण करून सर्व पथके १५ डिसेंबरला दुपारी मुंबईत पोहोचतील.
त्यानंतर दुष्काळाच्या मूल्यांकनावरील माहितीचे सादरीकरण राज्य सरकारच्या विविध विभागांकडून संयुक्त बैठकीत सादर केले जाईल. त्यामध्ये कृषी व मदत व पुनर्वसन विभागासह समावेश असेल. याशिवाय, दुष्काळी भागातील संबंधित क्षेत्रातील बँका, विमा कंपन्यांसोबतही पथकातील सदस्य चर्चा करणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
चाळीस तालुक्यात दुष्काळ…
राज्य सरकारने ३१ ऑक्टोबरच्या शासन आदेशाद्वारे १५ जिल्ह्यांत खरीप हंगामात दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार २४ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा, तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ १६ तालुक्यांमध्ये घोषित आहे. त्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतील ४० तालुक्यांचा समावेश आहे.