नगर – पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाणमध्ये सोमवारी पहाटे ५ वाजता सळईने भरलेला ट्रक गावातील घरावर, विजेच्या पोलवर जाऊन आदळला. यामध्ये गाडीचालक सळईबरोबर काचेतून बाहेर पडला. चालक बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गाडी आदळल्यामुळे पोल वाकला असून गावातील वीज पुरवठा खंडित झाला. ग्रामस्थ पहाटे झोपेत असताना मोठ्याने आवाज झाल्यामुळे संगीता शेळके यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सकाळी या ठिकाणी अनेक शालेय विद्यार्थी उभे असतात. सुदैवाने धोका टळला.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या नारायणगव्हाणमधील प्रलंबित कामे सुरू करावे, यासाठी गावामध्ये ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम सुरू आहे. सोमवारी दि.१८ तारखेला सा. बां.विभागाला चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात ग्रामस्थ सामूहिक निवेदन देणार आहेत.
नारायणगव्हाणकरांनी नगर-पुणे महामार्गासह नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी सातत्याने लढा देऊन रस्ता सुरक्षेसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. लढ्यांमुळे प्रलंबित ९४५ मीटरपैकी ८१५ मीटर काम पूर्ण झाले परंतु १३० मीटर कामासाठी गावाला वेठीस धरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता गावकऱ्यांसमोर रास्तोरोको शिवाय दुसरा पर्याय नाही. जर १८ तारखेच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर २ जानेवारीला गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके यांनी दिला आहे.
नारायणगव्हाणकर जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. प्रशासनाला परिस्थितीचे गांभीर्य नाही. एकाच घरावर तीन वेळा मोठमोठ्या गाड्या घुसल्या. भितीपोटी रस्त्यालगतच्या ग्रामस्थांनी घर सोडली. झोपेच सोंग करणाऱ्या प्रशासनाला जाग करण्यासाठी हतबल होऊन ग्रामस्थांनी गावात गाव बंद व नगर – पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याशिवाय ग्रामस्थ आता हटणार नाहीत.
शरद पवळे, सामाजिक कार्यकर्ते.