वीसगाव खोरे – उत्रौली (ता. भोर) येथील दत्तात्रय भिकू शिवतरे, गणपत शिवतरे, बबन सोनू शिंदे यांचे एकूण १२ हजार गवताची पेंढी जळून खाक झाली आहे. शनिवार (दि.१३) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक शाॅटसर्किटने आग लागली.
आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर काही क्षणातच जनावरांचा चारा कापून बांधून ठेवलेले गवताच्या १२ हजार पेंढ्या (दत्तात्रय भिकू शिवतरे ५ हजार, गणपत शिवतरे ४ हजार, बबन शिंदे ३ हजार) जळून खाक झाल्या आहेत. ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ओम महेंद्र शिवतरे हा आपली जनावरे रानामध्ये चारत असताना अचानक त्याच्या गवताच्या पेंढ्याना आग लागली असल्याचे निदर्शनास आले. त्याने वडिल महेंद्र शिवतरे यांना फोनद्वारे सांगितले.
शेतकरी तातडीने घटनास्थळी हजर झाले असता ती आग शाॅटसर्किटने लागल्याचे निदर्शनास आले. जनावरासाठी कापून ठेवलेला चारा जळून खाक होत होता. शेजारील शेतकऱ्यांना बोलावून घेवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने १२ हजार गवताच्या पेंढ्या जळून खाक झाल्या आहेत. तरी संबंधित विभागाने घटनास्थळाची पाहणी करून झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
“वर्षभराचा जनावरांचा चारा जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता जनावरांच्या चाऱ्यासाठी बाहेरून चारा विकत घ्यावा लागणार असल्याने आमच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. तरी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.” – दत्तात्रय भिकू शिवतरे, नुकसानग्रस्त, शेतकरी, उत्रौली.