ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दुरंगी लढत
सरपंचपदासाठी 5 तर सदस्यपदासाठी 65 अर्ज दाखल
उद्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार
नारायणगाव – नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाल्यानंतर दोन्ही गटांकडून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही गटांना ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व असावे असा प्रस्ताव समोर आल्याने तसेच वॉर्डात उमेदवार उभे करण्यावर तडजोड होऊ शकली नसल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यावर मार्ग निघाला नाही.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दिन 20) श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल, मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल आणि अन्य मिळून सरपंच पदासाठी 5 तर सदस्यपदासाठी 65 अर्ज असे एकूण 70 अर्ज दाखल करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतील दोन्ही गटांची तयारी बघता ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. सोमवारी (दि. 23) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर खरे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर त्याच दिवशी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनल प्रमुख संतोष खैरे व मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख सुजित खैरे दोघेही ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे
श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनल प्रमुख संतोष खैरे यांना नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत केलेल्या कामांच्या विकासाच्या जोरावर पुन्हा सत्ता स्थापन करता येईल असा विश्वास आहे तर मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख सुजित खैरे हे नारायणगावात मागील पाच वर्षांत अपेक्षित विकासाची कामे झाली नसल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचे सांगत आहेत.
प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे
मतदार राजा सुज्ञ असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांवरील विश्वास अथवा नाराजी ग्रामपंचायत निवडणुकीत टर्निंग पॉईंट ठरू शकेल. मतदारांनी कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता आणि भावूक न होता आपल्या वॉर्डाचा व गावाचा विकास करू शकेल अशाच उमेदवाराला मतदान करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा 2028 ची वाट पहावी लागेल हे मात्र निश्चित!