बारामती – केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशातील पहिल्या वीस स्वच्छ शहरात बारामतीचा समावेश झाला आहे. लोकसंख्येनिहाय विचार करता एक ते तीन लाखांदरम्यानच्या पहिल्या वीस शहरात बारामती देशातील एकमेव शहर ठरले आहे. बारामतीचा देशातील अठरावे स्वच्छ शहर म्हणून पहिल्या वीस शहरांच्या यादीत प्रथमच समावेश झाला आहे.
बारामतीने या स्पर्धेमध्ये 7968 गुण प्राप्त केले. देशात प्रथम आलेल्या इंदूर शहराने 9348 गुण प्राप्त केलेले आहे. इंदूरची लोकसंख्या 20 लाख असून बारामतीची लोकसंख्या एक लाख आठ हजार इतकी आहे. भारतातील पहिल्या वीस स्वच्छ शहरात बारामतीचा समावेश झाल्याने बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला. गेल्या काही वर्षांपासून बारामतीकरांनी स्वच्छतेबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न केले. बारामती नगरपालिकेने यात महत्वाची भूमिका बजावली.
मुख्याधिकारी महेश रोकडे व त्यांच्या सर्वच सहका-यांनी जाणीवपूर्वक शहर स्वच्छतेसाठी अनेक पावले उचलली. त्याचा परिणाम म्हणून बारामती देशातील पहिल्या वीस स्वच्छ शहरांमध्ये आले आहे. गतवर्षी एक ते तीन लाख लोकसंख्येच्या शहरांचा स्वतंत्र गट तयार केला होता. यंदा मात्र केंद्र सरकारने एक लाख व त्याहून अधिक सर्वच शहरांना एकाच श्रेणीत आणले आहे. यात एक लाखांपासून ते एक कोटी लोकसंख्येपर्यंतची सर्वच शहरे समाविष्ट झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार सुरवातीपासूनच स्वच्छतेबाबत कमालीचे आग्रही होते. त्यांनी जाणीवपूर्वक अनेक प्रकल्प राबविताना शहर स्वचछ व सुंदर कसे राहिल याची काळजी घेतली. त्याचा परिणाम म्हणून बारामती देशातील पहिल्या वीस स्वच्छ शहरात समाविष्ट झाले आहे. लोकसंख्येनिहाय विचार करता बारामती देशातील एक लाख लोकसंख्येच्या शहरात पहिले स्वच्छ शहर ठरलेले आहे.
नऊवरून तिसऱ्या स्थानावर झेप
तुलनात्मक विचार केला तर गतवर्षी बारामती शहर नवव्या स्थानावर होते, यंदा मात्र ते तिसऱ्या स्थानावर येऊन पोहोचलेले आहे. लोकसंख्येचा विचार करता एक लाखांच्या लोकसंख्येच्या शहरात बारामती देशात प्रथम क्रमांकावरच आहे. बारामतीच्या पुढे असलेल्या सर्व सतरा शहरांची लोकसंख्या बारामतीहून अधिक आहे. स्वच्छ शहर म्हणून नावलौकीक असलेले म्हैसूर शहरही बारामतीहून पाच क्रमांक खाली घसरले असून त्यांचा क्रमांक तेविसावा आहे.