मध्यरात्रीत शिजतोय खराब साखरेचा कट
पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथील गुऱ्हाळघरावर 50 किलोच्या 200 पिशव्या म्हणजे 10 टन खराब साखरेचा साठा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी (दि. 24) मध्यरात्री पकडला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून कारवाई होऊनही गुऱ्हाळ चालकांचा रात्रीस चालणारा खेळ काही केल्या बंद होत नसल्याचे दिसून येत आहे.
पारगाव येथे गेल्या आठवड्यात गुऱ्हाळ घरांचे प्रदूषण व गुळातील भेसळीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी पारगाव येथील सर्व गुऱ्हाळ मालकांनी एकत्र येऊन यापुढे कचरा जाळणार नाही तसेच गुळात साखर भेसळ करणार नाही असा एकमुखी ग्वाही दिली. परंतु तो निर्णय सहाच दिवसांत पायदळी तुडवला. परंतु ग्रामपंचायत प्रशासन दंडात्मक कारवाई करुन रिकामे होईल, यापेक्षा अधिक काय करणार.
त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या… अशी परिस्थिती होणार आहे. गुऱ्हाळावर उपस्थितांना त्या ठिकाणी कढईच्या उकळत्या रसात, साखरेची मोकळी पोती, प्लॅस्टिक डब्यांची झाकणे तरंगताना दिसून आली. खराब साखर पोत्यासह रसात टाकतात. याचीही पर्वा येथील परप्रांतीय गुऱ्हाळ चालकांना नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील परप्रांतीयांवर कडक कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत. साहजिकच नागरिकांना या पुढे न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार हे मात्र नक्की.
परप्रांतीय गुऱ्हाळचालकांचे जागा मालक हे धनदांडगे असल्याने, परप्रांतीय कोणत्या हि कारवाईस भीत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्याविरुद्ध आवाज उठवू शकत नाहीत. परंतु ग्रामपंचायतीने जबाबदारी घेवून परप्रांतीय गुऱ्हाळ चालकांना समज देण्याची गरज आहे. तसेच याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात येणार आहे.
– संभाजी ताकवणे, संचालक मार्केट कमिटी दौंड
कोणी ही गुऱ्हाळांवर खराब साखर, मुदतबाह्य चॉकलेटची भेसळ करून गूळ उत्पादन करीत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. आपण बनविलेला गूळ लहान मुले, आजारी लोक खात असतात. चकाचक दिसणाऱ्या गुळात जर भेसळ असेल तर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
– विजय शिवरकर, उपसरपंच पारगाव