वसंतराव बाणखेले : आंबेगावमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडू वाटून आनंदोत्सव
मंचर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चाळीस वर्षानंतर प्रथमच मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या कणखर नेतृत्व मिळाले. आरक्षणासाठी अनेकांनी आपले जीव गमावले असुन आज त्यांचे सार्थक झाले. आंदोलन तात्पुरते स्थगित असून, आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा आंबेगाव तालुका सकल मराठी समाजाचे नेते वसंतराव बाणखेले यांनी शनिवार दिनांक २७ रोजी दिला.
याप्रसंगी बाळासाहेब बाणखेले, गणेश खानदेशे, दिपक पोखरकर, सुरेश निघोट, आश्विनीताई शेटे, मिरा बाणखेले, खंडेराव आढळराव, प्रविण मोरडे, संदिप बाणखेले, संगीता बाणखेले, दादा थोरात, ऍड. राजू बेंडे, ऍड. श्रीराम बांगर, नवनाथ निघोट, जगदीश घीसे,अमोल शिंदे, विक्रांत भोर, परशुराम भेके, अमोल मोरडे , अनिल निघोट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला आंदोलनाबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेत अध्यादेश जारी केल्याने मंचर ता. आंबेगाव येथे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा करण्यात आला.
बाणखेले म्हणाले की, मनोज जारंगे पाटील यांनी आंतरवाली येथून आंदोलनात सुरुवात केली बघता बघता लाखो मराठा बांधव त्यांच्या मागे उभे राहिले. आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत मोर्चा घेण्यात आला मोर्चाचे स्वरूप पाहता राज्य सरकारने दखल घेत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या मराठा समाजाने अतिशय शांततेत आंदोलने केली.
आंदोलन मोडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, समाज मागे हटला नाही व आज त्यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने जरांगे पाटील यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेतले आहे. मात्र सरकारने पुढील काळात शब्द पाळला नाही तर पुन्हा एकत्र येऊन आंदोलन करावे लागेल असेही बाणखेले म्हणाले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे म्हणाले की, आजचा दिवस हा मराठा समाजासाठी सोनेरी दिवस असून, गेली ४२ वर्षांपूर्वी स्व. अण्णासाहेब पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात उठाव निर्माण केला होता. यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी प्राणाची आहुती दिली. अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले व बघता बघता आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले.
दरम्यान, राजाराम बाणखेले म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत अध्यादेश जारी केले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारे दिवाळी साजरी झाली असून मराठा समाजाला त्यांचा न्याय हक्क आता मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.