पाथर्डी – माय बापहो तुमच्या पाठबळावर आरक्षणाच्या शेवटच्या लढाईसाठी मुंबईला चाललो आहे. मागे येईल किंवा नाही माहीत नाही. आपलं माय लेकराचं नातं आहे, आम्हाला उघड पडू देऊ नका. काही दगाफटका झाला तर आंदोलन सुरू ठेवा. आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला तर या लेकरांच्या मागे भक्कम उभे रहा. काम आहे थोडे बाजूला ठेवून आंदोलनात सहभागासाठी मुंबईची वाट धरा. ‘अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झाली असून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी दिला.
तालुक्यातील आगसखांड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मराठा समाजासह इतर समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जरांगे म्हणाले की, राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या तर नगर जिल्ह्यात सव्वादोन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या. मात्र, तरीही सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. आपल्याला आणखी वेळ द्यावा, असे शासन म्हणत असले तरीही यापूर्वी सात महिन्यांचा अवधी देऊनही आमची मागणी अजून मान्य केली नाही व प्रमाणपत्रे सुद्धा दिली नाही. मराठे कोणाला घाबरत नाही हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. तुमच्यात एकी नाही, असे ते म्हणत होते. मात्र, आता मराठा समाज एकवटला असून तुम्हाला तुमची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सरकारने कोणताही डाव टाकला तरीही तो आपण आता यशस्वी होऊ देणार नाही. तुमच्या आशिर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो असून परत येईल की नाही हे मला माहित नाही. मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालू ठेवा.
वेळप्रसंगी हातातील कामे सोडून रस्त्यावर उतरा. आपल्या मतांच्या जीवावर यांनी राजकरण केले असून, आता आरक्षण दिले नाही तर यांना सळो कि पळो करून सोडा, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. तेवीस दिवस मी उपोषण केले असल्याने सध्या माझी तब्बेत बरी नाही मात्र आता तुम्हीच माझे माय बाप आहात. मी मरणाला घाबरत नाही. माझे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी घालवणार आहे. मला कोणत्याही गोष्टीचा मोह नसल्याने कोणतेही आमिष मला सरकार देऊ शकत नाही. मी सरकारला मॅनेज होत नसल्याने सरकारची अडचण झाली आहे. माझा जीव गेला तरीही बेहत्तर पण आरक्षण मिळाल्याशिवाय आता मी माघार घेणार नाही. तुम्हीच माझे कुटुंब असून मी माझ्या घरी सुद्धा सात महिने झाले तरीही गेलो नसून माझ्या पाठीशी तुम्ही ताकदीने उभे राहण्याची गरज आहे.मराठा आरक्षणाचा निर्णय लावून आता आपल्याला गुलाल उधळायचा असून, हा गुलाल उधळण्यासाठी आता सज्ज व्हा. माझ्या मुंबई येथील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन जरांगे यांनी केले.