भिगवण -अतिमुसळधार पावसामुळे काझड (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा पाणी स्थिरीकरण बोगद्यात जमिनीखाली सुमारे दीडशे फुटावर काम करीत असलेल्या पंधरा कामगारांना बसला. मात्र, प्रशासनाने वेळेत प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली. केवळ बिनतारी संदेश यंत्रणेमुळे 15 कामगार बचावल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बुधवारी (दि.14) मुसळधार पावसाने काझड परिसरात पाणी साचले होते. यातच नदीजोड प्रकल्पाचे काझडच्या तीन नंबर शॉप्टच्या ठिकाणी दीडशे फूट खोलीवर बोगद्यात कामगार काम करीत होते. मात्र, यावेळी पाऊस झाल्याने कामाच्या ठिकाणीजवळील आजूबाजूचे छोटे, मोठे तलाव पाण्याच्या जोराच्या प्रवाहाने फुटले. ज्या मार्गावरून कामगार क्रेनच्या साहाय्याने जात होते. त्या ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह आत मध्ये धबधब्याप्रमाणे कोसळला. बोगद्यात पाणी साचल्याने कामगार भयभीत होऊन बाहेर निघाण्यासाठी क्रेनची वाट पाहू लागले.
मात्र, क्रेनच्या मार्गावरच पाणी कोसळल्याने बोगद्यात झपाट्याने पाणी वाढले. यावेळी कामगारांच्या पायाच्या वर पाणी सरकल्याने सर्व कामगार भयभीय झाले होते. मात्र, बोगद्यातील कामगारांकडे बिनतारी संदेश यंत्रणा होती. त्यावरून संपर्क साधून कामगारांनी क्रेन खाली सोडली. मात्र, याच मार्गावरून पाण्याचा प्रवाह जोरात खाली कोसळल्याने क्रेनमध्ये चार ते पाच कामगारांना बसवून दोन ते तीन खेपा करून वर खेचून घेतले.
त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी पाण्याचा वेग इतका होता की, तीन किलोमीटर बोगद्यात चार ते पाच फूट पाणी हे सर्व कामगार वर काढताना साचले होते. पावसामुळे नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्यात तीन किलोमीटर पाणी साचल्याने काम बंद ठेवून पाणी काढण्याचे काम सुरू आहे. नीरा भीमा नदी जोड प्रकल्पाचे पाच शॉप्टच्या ठिकाणी काम सुरू आहे. यातील चार, पाच, सहा शॉप्ट एकमेकांना जोडून सध्या साडेतेरा किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. एक, दोन, तीन शॉप्टच्या ठिकाणी काम सध्या सुरू आहे.