तालुक्यातील स्थिती : काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट
हितेंद्र गांधी
जुन्नर – भाताचे कोठार आणि पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे जवळपास 10800 हेक्टर क्षेत्रात होणारी भात लागवड रखडली आहे. जून महिन्याच्या सुरवातीला अवकाळी पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने तालुक्यात तुरळक ठिकाणी भात रोपांची पेरणी करण्यात आली होती. मात्र पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे भाताच्या रोपांची पेरणी केलेल्यांचे धाबे दणाणले आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
दरम्यान तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी न लावल्याने बळीराजा हवालदिल झाला असून शेतातील नांगरणी, कुळवणी, जमीन सपाटीकरण, बांधबंदिस्ती आदी मशागतीच्या कामांना उशीर होत आहे. मॉन्सून जवळ आल्याने शेतातील कामे करण्यासाठी बैलजोडी बरोबरच ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. तालुक्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस दमदार हजेरी लावत असतो; मात्र यंदा अद्याप पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात तरी पावसाचे आगमन व्हावे, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
तालुक्यात इंद्रायणी, फुले समृद्धी या वाणांची तालुक्यात सर्वाधिक लागवड होते. तर पारंपरिक आंबेमोहोरची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. कारण ही पिके येण्यास जवळपास 130 ते 150 दिवस लागतात. तर इंद्रायणी, फुले समृद्धी आदी जातींच्या उत्पादनास 110 ते 120 दिवस लागतात.
जुन्नर तालुक्यात भातशेती अत्यंत बेभरवशाची झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात आंबेमोहोर, जिनी, कोलम, रायभोग आदी भातपिके घेण्यात येत होती; मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी कमी दिवसांत तयार होणाऱ्या भात रोपांकडे आम्ही वळत आहेत.
– निलेश भालचिम, शेतकरी, आंबोली (ता. जुन्नर)