राजाराम बाणखेले यांची भीष्म प्रतिज्ञा
मंचर- शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मला उमेदवारी देण्यासाठी शिफारस करावी. त्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे. जर शिवसेनेने मला उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे अपक्ष सदस्य राजाराम बाणखेले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये परिवर्तन यात्रेचे आयोजन 16 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यत करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील गावनिहाय नियोजनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन बाणखेले यांनी केले होते. त्यावेळी बाणखेले बोलत होते. यावेळी जालिंदर बिबवे, कमरअली मणियार, अजित मोरडे, बाळासाहेब थोरात, अखिलभाई शेख, विनोद घुले, वैभव पोखरकर, किशोर बाणखेले, विशाल घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
राजाराम बाणखेले म्हणाले की, शिवसेनेच्या उमेदवारीसाठी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी गावापर्यंत लोटांगण घालण्याची माझी तयारी आहे. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांना मुंबई येथील शिवसेना भवनमध्ये भेटुन उमेदवारीसाठी अर्ज दिला आहे. तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची लांडेवाडी येथे समक्ष भेट घेऊन उमेदवारी मिळविण्यासाठी चर्चा करणार आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले यांनी मला संपर्क करुन आढळराव पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन बोलणे करुन दिले. आढळराव पाटील यांनीही चर्चेसाठी बोलविल्याचे बाणखेले यांनी सांगितले. जर शिवसेनेकडून उमेदवारीबाबत निर्णय झाला नाही आणि भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढले तर भाजपकडून उमेदवारी दिल्यास त्याचा विचार करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन निर्णय घेतला जाईल. गेल्या 30 वर्षात आंबेगाव विधानसभा मतदारसंघात विकास झाल्याचे विद्यमान लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात येते, परंतु प्रत्यक्ष विकासाचा बोलबाला झाला आहे.