पुणे – करोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत अक्षरश: लाखो रुपये घेऊन ब्लॅकने विक्री होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन्सची मागणी आता घटली आहे. त्यामुळे सध्या रुग्णाला आवश्यक तो पुरवठा करणे शक्य झाले आहे.
रुग्णाच्या शरीरातील विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण, फुफ्फुसांमध्ये झालेला संसर्ग, त्याला दिसणारी लक्षणे, रुग्णाला असलेल्या सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार) अशा सर्वांचा विचार करून करोनाच्या रुग्णांवर आजपर्यंत उपचार केले जात आहेत. यावर उपचारासाठी कोणतेही ठोस औषध अद्याप निर्माण झाले नाही.
करोनाच्या पहिल्या लाटेत रेमडेसिवीर या इंजेक्शनचा “रिझल्ट’ चांगला आहे या धारणेतून या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. एकेका इंजेक्शनसाठी हजारो- लाखो रुपये पुणेकरांनी मोजले. या पार्श्वभूमीवर आता रेमडेसिवीरच्या किमती राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रित केल्या. त्यामुळे त्याचे वाटप सुयोग्यपद्धतीने झाले. आता मुळातच मागणी कमी असल्याने त्याची उपलब्धता पुरेशी आहे.
याशिवाय टोसिलीझुमॅबची उपलब्धताही पुरेशा प्रमाणात असून, दुसऱ्या लाटेत याचाही तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे त्याचेही वितरणही जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षेमार्फत करण्यात येत होते. रेमडेसिवीरप्रमाणे हे इंजेक्शन थेट रुग्णालयांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
रेमडेसिवीरचा पुरवठा हा मागणीच्या तुलनेत पुरेसा आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी नियंत्रण आवश्यक राहिलेले नाही. त्यामुळे ते खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यात 12 एप्रिलपासून एक लाख 78 हजार 724 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्याच्या मागणीनुसार उत्पादकांकडून आवश्यक पुरवठा होत आहे.
– श्याम प्रतापवार, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन