पुणे- राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट “क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवाराने अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिकाऱ्यांचे अंतर्गत येते त्याच विभागातील जिल्ह्यात उमेदवारास परीक्षा केंद्र दिले गेले आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी रविवारी केले.
आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी 24 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. याच्या प्रवेशपत्रावरून उमेदवारांकडून ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण देत उमेदवारांना जवळचे परीक्षा केंद्र देण्यात आल्याचे म्हटले आहे. न्यासा कम्युनिकेशन कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. गट “क’मधील 52 संवर्गातील 2 हजार 739 पदांसाठी 4 लाख 5 हजार 163 अर्ज आले आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही शनिवारपासून सुरू झाली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 2 लाख 7 हजार 137 प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहेत.
उमेदवाराने अनेक पदांसाठी अर्ज केला तरीही ज्या पदाच्या परीक्षेसाठी बसतील त्याच पदाच्या नियुक्तीसाठी त्यांचा विचार केला आहे.
52 संवर्गातील पदासाठी परीक्षा दोन सत्रात घेण्यात येतील. एका सत्रात दहावी ते बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणाऱ्या पदांसाठी तर दुसऱ्या सत्रात पदवी आणि त्यावरील शैक्षणिक पात्रता आवश्यक असणाऱ्या पदांचा समावेश आहे. परीक्षा केंद्र देताना उमेदवारांच्या प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला आहे. उमेदवारांनी एका मंडळात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यासाठी एकाच शहरात दोन सत्रात परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. पुणे, नाशिक, अकोला मंडळांत जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे त्या मंडळातील उमेदवारांना नजिकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे दिली आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
दिव्यांग उमेदवारांना जवळचे केंद्र
उमेदवारांना शक्यतो जवळचे केंद्र दिले आहे. मात्र, वेगवेगळ्या नेमणूक अधिकाऱ्यांचे अंतर्गत अर्ज केला असल्यास त्या अधिकारी कार्यक्षेत्रात केंद्र देण्यात आले आहे. प्रवेशपत्रावर छायाचित्र आणि सही अस्पष्ट असल्यास उमेदवारांनी न्यासा कम्युनिकेशन कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नाही
माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नसल्याने नऊ हजार माजी सैनिकांना प्रवेश पत्र देण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात नागपूर नावाचे गाव आहे. ते परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे प्रवेशपत्रावर अहमदनगर जिल्हा नमूद केला आहे. काही प्रवेश पत्रात पिनकोड चुकला आहे. मात्र, पत्ता बरोबर आहे. पिनकोड सुधारणा केली जाईल, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.