‘पे फॉर पोस्ट’च्या माध्यमातून एजन्सीचा बाजार
कृत्रिम प्रचार; मतदारांनी जागृत राहण्याची गरज
विशाल भालेराव
खडकवासला – महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियावरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रभाग रचनेनंतर मतदारांचा कौल घेण्यासाठी विविध पोस्ट टाकल्या जात आहेत. एवढेच नव्हे आपण योग्य उमेदवार असल्याचे सांगण्यासाठी अशा पोस्टना “फेक’ लाइक्स, कमेंटही दिल्या जात आहेत.
यासाठी “पे फॉर पोस्ट’च्या माध्यमातून कृत्रिम लोकप्रियता मिळवली जात आहे. अनधिकृत “बल्क मेसेज’चा माराही सुरू झाला आहे, अशा कामांसाठी स्वतंत्र “वॉर रूम’ तयार आहेत. निवडणुकीमुळे “सोशल मीडियाचा फेक व्यवसाय’ मोठ्या प्रमाणात फोफावतो आहे. त्यामुळे मतदारांनी अधिक जागरूक व वैचारिक होण्याची गरज आहे.
महानगरपालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा “रोल’ मोठा असल्याचे सांगितले जाते. याद्वारे विद्यमान नगरसेवकांबाबत नागरिकांचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याच प्रभागातील, पक्षातील इच्छुक उमेदवारांनी काही एजन्सीला हाताशी धरून “ब्रॅकेट सर्वे’ सुरू केला आहे.
सोशल मीडियावर स्वतःबाबतचे नागरिकांचे मत यावर अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी फिल्डींग लावली जात आहे. यातून आतापासूनच सोशल मीडियावर राजकीय धुरळा उडू लागला आहे. प्रभाग रचना बदलल्यानंतर कार्यकर्त्यांचे काम वाढले आहे. मतदारांची माहिती मिळविण्यासाठी इच्छुकांकडून “डेटा खरेदी’केली जात आहे. याच डेटाद्वारे सोशल मीडियाच्या सहाय्याने पोस्ट करून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वर्तमानपत्राची विश्वासार्हता अधिक…
सोशल मीडियापेक्षा वर्तमानपत्र अधिक विश्वासार्य असल्याचे जागरूक नागरिकांचे ठाम मत आहे. निवडणुकीच्या काळात वर्तमानपत्रातून नेमकी वस्तुस्थिती मांडण्यात येत असल्याने तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारीपूर्ण वार्तांकन केले जात असल्याने त्यानुसार आपले “मत’ तयार करणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही मोठे आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.