पुणे- पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीसह पीएमआरडीए हद्दीत (पुणे जिल्ह्यात) दररोज सुमारे 1 हजार 600 बसेसद्वारे सेवा देण्यात येते. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2 हजार 190 हून अधिक बसेस आहेत. त्यापैकी सुमारे 950 हून अधिक बसेस या ठेकेदारांच्या आहेत. ई-बसेसचा देखील समावेश आहे. यातील जवळपास 650 बसेस शुक्रवारी दुपारपर्यंत जागेवरच होत्या. यामध्ये ओलेक्ट्रा ग्रीनटेक, ट्रॅव्हलटाइम कार रेन्टल, ऍन्टोनी गॅरेजेस, हंसा वहन इंडिया, एमपी इन्टरप्रायझेस ऍन्ड असोसिएट्स या कंपन्यांचा समावेश होता. तर पीएमपी प्रशासनाने 58 कोटी रुपये अदा केल्यानंतर ठेकेदारांनी बससेवा सुरू केली. दरम्यान, शुक्रवारी दुपारपर्यंत पीएमपीच्या मालकीच्या बसेस आणि बीव्हीजी, विश्वयोद्धा या कंत्राटदारांच्या बसेसचे संचलन सुरू होते.
प्रवाशांचा खोळंबा
बसेस स्थगित केल्यामुळे लाखो पुणेकरांना फटका बसला. कामाचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गाची अधिक गैरसोय झाली. सध्या शालेय परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती. बसेस बंद राहण्याबाबतची पूर्वकल्पना नसल्याने प्रवाशांना कसरत करावी लागली. मिळेल त्या बसमध्ये, गर्दीत नागरिकांनी प्रवास करत इच्छितस्थळ गाठले. तर बसेस धावण्याबाबत ठोस माहिती नसल्याने प्रवासी बसथांब्यांवर ताटकळत उभे होते. एकीकडे बसेसच्या दिरंगाईचा त्रागा आणि दुसरीकडे तळपते ऊन अशा दुहेरी त्रासांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
ग्रामीण भागात हाल
जिल्ह्यात 78 मार्गांवर पीएमपी बसेस धावतात. पण, शुक्रवारी या मार्गांवरील बसेसच्या वेळापत्रकात देखील मोठा बदल झाला होता. यातच एसटीच्या बसेस अनेक मार्गांवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता.
“शेअर’ रिक्षांना भाव
शहरातील बाजारपेठा, उपनगरे आणि मनपा हद्दीलगतच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर “शेअर’ रिक्षा धावतात. शुक्रवारी बसेसच्या गोंधळामुळे नागरिकांनी “शेअर’ रिक्षाला पसंती दिली. त्यामुळे अनेक भागांमध्ये शेअर रिक्षा आणि खासगी प्रवासी वाहनांना विशेष भाव होता.
गरज भासल्यास काम काढून घेणार
पीएमपी बस पुरवठादारांना प्रशासनाचा इशारा
पुणे-“पीएमपी ही अत्यावश्यक बससेवा आहे. त्यामुळे ती “मेस्मा’ कायद्यात येते. या कायद्याच्या अनुषंगाने ठेकेदारांवर कारवाई केली जाईल. तसेच गरज भासल्यास त्यांचे कामही काढून घेण्याची पीएमपी तयारी करत आहे,’ अशा शब्दांत पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ठेकेदारांना इशारा दिला आहे.
बस पुरवठादार ठेकेदारांनी दुपारनंतर संप मागे घेतला. या पार्श्वभूमीवर मिश्रा यांनी पत्रकारांना माहिती दिली. महापालिकाआयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यावेळी उपस्थित होते.
मिश्रा म्हणाले, “करोना काळातील बिलांपोटी ठेकेदारांना दोन महिन्यांपूर्वी 66 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर 58 कोटींची थकबाकी देण्याबाबत त्यांनी पत्र दिल्यानंतर त्यांना पैसे देण्यात येत असल्याचे कळवले होते. त्यांची बिले गुरुवारी सायंकाळी मान्य करून धनादेशावर स्वाक्षरीही केली होती. याशिवाय दररोज बस ठेकेदारांना 70 लाख रुपयांची रक्कम दिली जाते. मात्र, सायंकाळी बॅंका बंद झाल्याने पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नव्हते. तर सकाळी बॅंक उघडताच त्यांना पैसे दिले गेले. याबाबत कल्पना असतानाही ठेकेदारांनी बससेवा बंद ठेवली. याबाबत ठेकेदारांशी झालेल्या कराराची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.’
आता दरमहा ठेकेदारांसोबत बैठक
भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी प्रत्येक महिन्यात बस पुरवठादार ठेकेदारांची बैठक घेतली जाणार आहे. तर प्रत्येक दोन महिन्यांनी त्यांच्या बिलांचा आढावा घेतला जाणार आहे. त्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना पीएमपी प्रशासनाला दिल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. तसेच पीएमपीची संचलन तूट कमी करण्यासाठी उत्पन्नाचे इतर स्रोत सक्षम करण्यात येत असल्याचेही कुमार म्हणाले.
शुक्रवारी सकाळी बीव्हीजी आणि विश्वयोद्धा या कंपनीच्या बसेस सुरू होत्या. ठेकेदारांवर “मेस्मा’अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून, या अनुषंगाने नोटीस देखील त्यांना दिली आहे.
– डॉ. चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
शुक्रवारी सकाळ फेरीत 900 बसेस मार्गावर होत्या. तर ठेकेदारांच्या 650 बसेसची सेवा देण्यात येत नव्हती. दुपारी सुमारे बारानंतर ठेकेदारांच्या बसेसची सेवा पूर्ववत झाली. त्यानंतर शहरातील बसेसचे संचलन सुरळीत सुरू होते.
– राजेश रुपनवर, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी
मागील आठ महिन्यांपासून आम्हांला बसेसचे पैसे मिळाले नाही. याबाबत प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार केले होते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आम्हाला बस चालवणे शक्य नव्हते. त्यामुळे शुक्रवारची घटना संप नसून, “ऑपरेशनल ब्रेकडाऊन’ होते. बसेसची सुमारे 100 कोटी रुपये रक्कम थकीत असून, त्यापैकी सुमारे 50 कोटी रुपये बस कंपन्यांना मिळाले आहेत. त्यानंतर आम्ही बसेसची सेवा पूर्ववत केली.
– शैलेश काळकर, ठेकेदार, ट्रॅव्हलटाइम
अर्धवट बसथांब्यांमुळे गैरसोय
शुक्रवारी उन्हाचा पारा 38 अंशांवर पोहोचला होता. अनेक बसथांब्यांवर “शेड’ किंवा आसनव्यवस्था नसल्याचे चित्र आहे. नागरिकांना बसेसची वाट पाहात उन्हात उभे राहावे लागले. त्यामुळे मनस्तापात भर पडली होती.