सातारा – पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजप वर्चस्वशाली पक्ष ठरला आहे, असे विश्लेषण प्रसिद्ध राजकीय विश्लेषक व शिवाजी विद्यापीठामधील राज्यशास्त्र विभागातील प्रा. प्रकाश पवार यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याचा तसेच छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अमृत महोत्सवानिमित्ताने कॉलेजचा राज्यशास्त्र विभाग आणि शिवाजी विद्यापीठाचे नेहरू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 27 वी शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद आणि “भारतीय राजकारणाची 75 वर्षे : स्थित्यंतरे आणि वाटचाल’ या विषयावर प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले. यामध्ये राज्यांच्या 2022 मधील विधानसभा निवडणुकांचे विश्लेषण प्रा. पवार यांनी केले.
अध्यक्षस्थानी कुरूंदवाड कॉलेजच्या प्रा. डॉ. श्रद्धा कोठावळे होत्या. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि आम आदमी पक्षाला कामगिरी चांगली करता आली. दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, बहुजन समाज पक्ष या प्रमुख तीन पक्षांना अपयश आले. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने बहुमत मिळविले. भाजपला या चारही राज्यांमध्ये मतांची टक्केवारी वाढवण्यात यश मिळाले, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या 690 जागा होत्या. त्यापैकी 356 जागा एकट्या भाजपने जिंकल्या. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागा जिंकल्या. त्यांनी सामाजिक रसायन यशस्वीपणे घडवून आणले. हिंदी भाषिक पट्ट्यात आम आदमी, भाजप, प्रादेशिक पक्ष (बिहार आणि उत्तर प्रदेश) अशी त्रिकोणी सत्तास्पर्धा उदयास आली आहे. कॉंग्रेस पक्ष पंजाबमध्ये निवडणूक व्यवस्थापन करण्यात पराभूत झाला. राष्ट्रीय राजकारणात आम आदमी पक्ष भाजपविरोधी भूमिका घेऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. परिषदेचा व चर्चासत्राचा समारोप डी. जी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. डॉ. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.
=================