पुणे – तिळाच्या उत्पादनात एकरी उत्पन्न कमी मिळत आहे. त्यामुळे देशात तिळाचे उत्पन्न कमी होत आहे. यंदा कमी लागवड आणि अवकाळी पावसामुळे देखील उत्पादनात घट झाली आहे. देशात तीळ उत्पादित राज्यात अवेळी पाऊस झाल्याने उत्पादनाला मोठा फटाका बसला आहे. नेहमीच्या तुलनेत ४० ते ५० टक्केच उत्पादन होणार आहे. संक्रातीच्या तोंडावर तिळाच्या भावात तेजी कायम राहणार आहे. तीळाचे उत्पादन देशात घटत असल्याने तिळाच्या दरात ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे.
संक्रांतीसाठी तिळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. चिक्की, रेवडी, गजक आदींसह इतर वस्तूंची मागणी असल्याने तिळाचा खप ढला आहे. सध्याची मागणी, शिल्लक साठा आणि उन्हाळी हंगामात येणारे नवीन उत्पादन या सर्वांचा विचार करता चार ते पाच महिने तिळाचे भाव चढेच राहतील, असा अंदाज मार्केट यार्डातील तीळाचे व्यापारी आणि दी पूना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा यांनी दिली.
पावसामुळे तीळ हलका आणि कमी दर्जाचा, डागी तीळाचे उत्पादन जास्त निघत आहे. बाजारात सध्या दर्जेदार तीळाला जास्त मागणी जास्त आहे. देशात तीन प्रकारच्या तिळाचे उत्पादन होते. यामध्ये पांढरा, लाल आणि काळ्या तिळाचा समावेश आहे. पांढऱ्या तिळाचा वापर रोजच्या आहारात केला जातो. तसेच मिठाईमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो.
काळा तीळ हा मुख्यत्वे आयुर्वेदाप्रमाणे तेल आणि हाडाच्या मजबुतीसाठी वापरला जातो. लाल तिळाचा वापर तेल तयार करून पूजा व होमहवनासाठी केला जातो. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिसा या राज्यांत तीळाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते.
“शेतकरी तिळाऐवजी इतर पिकांकडे वळला आहे. देशासह जगात तिळाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तिळाच्या भावात तेजी आहे. जागतिक पातळीवर भारतातील तिळाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.” – अजित बोरा, निर्यातदार आणि उपाध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर