पुणे – केंद्रीय ऑनलाइन पद्धतीद्वारे राबवण्यात येत असलेल्या इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांत 15 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला आहे. यातही विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी 7,121 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दुसऱ्या फेरीत 63 हजार 757 प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 35 हजार 694 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदविण्यासाठी 6 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. या फेरीत सर्वाधिक महाराष्ट्र बोर्डाच्या 31,064 अर्जांपैकी 13,892 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत.
सीबीएसईच्या 3,510 पैकी 1,492 जणांना प्रवेश मिळाला आहे. आयसीएसईच्या 829 पैकी 440 विद्यार्थ्यांचा प्रवेशात समावेत झालेला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविल्यानुसार गुणवत्तेनुसार त्यांना प्रवेश मिळतात.
प्रथम पसंतीक्रम नोंदविलेल्या 6 हजार 40 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. प्रवर्गनिहाय प्रवेशाचा विचार करता सर्वाधिक खुल्या प्रवर्गातील 11 हजार 958 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. एससी-1 हजार 759, ओबीसी-1 हजार 98 विद्यार्थ्यांना या प्रवेशात समावेश आहे.