पॅरा नेमबाज अवनी लेखरा, सुमित अंतिल, भालाफेकपटू देवेंद्र झझारिया तसेच टेबल टेनिसपटू भाविना पटेल या भारताच्या खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये देशाला पाठोपाठ पदके मिळवून दिली. मूळ ऑलिम्पिकमध्ये भारताने यंदा जे यश मिळवले होते त्यातूनच प्रेरणा घेत या खेळाडूंनी आपल्या व्यंगावर मात करत देदीप्यमान कीर्ती मिळवली.
खरेतर या कामगिरीचे वर्णन असे थोडक्यात करणे योग्य नाही कारण त्यामागे या खेळाडूंची अफाट जिद्द तसेच मेहनतही आहे आणि ती देखील फारसा पाठिंबा मिळालेला नसताना. एकूणच ज्या देशात क्रिकेट सोडून अन्य खेळांना महत्त्वच दिले जात नाही अशा आपल्या देशात या यशाचे मोल अनमोल आहे.
भाविना
भाविनाने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या टेबल टेनिसमध्ये रजतपदकाचा मान मिळवला मात्र, तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली याचे शल्य जास्त आहे. जागतिक क्रीडा क्षेत्रावर चीन, जपान, अमेरिका, रशिया, कोरिया या देशांची मक्तेदारी असली तरीही गेल्या दशकापासून भारतीय खेळाडू देखील आपले अस्तित्व सिद्ध करत आहेत.
यंदाच्या स्पर्धेत भाविनाने देशाला पहिले पदक मिळवून दिले याचा अभिमान आहे. भाविनाची लढत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोऊ यिंगशी झाला. तिने भाविनाला संधी दिली नाही हे जरी खरे असले तरीही भाविनाने केलेल्या कामगिरीचे मोल कमी होत नाही. या स्पर्धेच्या इतिहासात टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिलीच भारतीय महिला पॅरा खेळाडू ठरली हे काय कमी आहे!
भाविनाची चिकाटी आणि जिद्दीने मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. भाविना केवळ एक वर्षाची असताना तिला पोलिओ झाला. मात्र, तिने स्वतःला कधीही अपंग समजले नाही. अन्य सामान्य खेळाडूंप्रमाणेच ती वावरत होती. मी काहीही करू शकते आणि मी कोणापेक्षा कमी नाही, अशा साध्या कल्पनेत तिने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. अनेकदा अपयशाचा, अपमानाचा सामना केला मात्र, तक्रार कधीही केली नाही. उलट ज्यांनी तिच्याकडे पूर्वी दुर्लक्ष केले तेच आता तिचे गुणगान गात आहेत, यातच तिचे यश सामावलेले आहे.
भाविना पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी रजतपदक पटकावणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी 2016 साली दीपा मलिकने गोळाफेक स्पर्धेत 4.61 मीटर अंतर नोंदवताना रजतपदक पटकावले होते. गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावात भाविनाचे बालपण गेले. 1986 साली तिचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. जमतेम वर्षाची असताना पोलिओमुळे अपंगत्व आले. पाच जणांच्या कुटुंबात तिचे वडील एकटेच कमावणारे होते. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते.
ती या व्यंगातून मुक्त व्हावी यासाठी तिच्यावर विशाखापट्टणममध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, तरीही तिला संपूर्ण आयुष्य व्हिलचेअरवरच जगावे लागणार हे देखील कटू सत्य स्वीकारावे लागले. तरीही तिने जिद्दीने सगळ्या संकटांवर मात केली. तिने आशियाई क्रीडा
स्पर्धेतही पॅरा गटात अनेक पदके पटकावली आहेत. तिने आजवर तब्बल 28 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून त्यात पाच सुवर्ण, 13 रजत तर, चार ब्रॉंझ पदके देशाला मिळवून दिली आहेत. 2011 साली तिला सरदार पटेल तसेच एकलव्य पुरस्काराने गौरवण्यातही आले होते.
टोकियोत भाविनाने यंदा चमत्कार घडवला. रजतपदक मिळवताना तिने दाखवलेला आत्मविश्वास नव्या पिढीसाठी प्रेरणा तर ठरेलच शिवाय ज्यांना आपल्या अपंगत्वाची भीती वाटते व त्यामुळे जे क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा विचारही करत नाहीत अशांनाही प्रोत्साहन देण्यात भाविनाचे यश उपयुक्त ठरेल यात शंका नाही. भाविना मायदेशी परतेल तेव्हा तिच्यासाठी गुजरात सरकार रेड कार्पेटही टाकेल.
मायदेशी परतण्यापूर्वीच गुजरात सरकारने भाविनाला तब्बल तीन कोटी रुपयांचे रोख बक्षिस जाहीर करत राज्य तिच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे. भाविनाला सरकारी नोकरीही देण्यात येणार असून जर तिला प्रशिक्षक म्हणून नवी गुणवत्ता शोधायची असेल तर तिच्या अकादमीसाठीही मदत केली जाणार आहे. आपल्या राज्यातही असे शेकडो खेळाडू असतील; परंतु वेळेवर दखल घेतली जाते का तसेच त्यांच्या मदतीसाठी सरकारी स्तरावर काय होते, तिला मदत करण्यासाठी खासगी प्रायोजक तरी पुढे येतात का हा संशोधनांचा विषय आहे.
या स्पर्धेत भाविनाने खेळलेला प्रत्येक सामना पाहिला तर असे लक्षात येते की, टेबल टेनिसचा खेळ व्हिलचेअरवर खेळणे किती कठीण आहे. आपण तर सामान्य माणसे आहोत. आपण हा खेळ खेळताना आपल्याला किती कसरत करावी लागते हे सांगू शकतो किंवा समजू शकतो, पण व्हिलचेअरवर बसून हा खेळ केवळ अशक्य समजले जात होते. त्यातही एख भारतीय महिला खेळाडू हा खेळ खेळताना आपण फारसे पाहिलेही नसेल.
यंदा टोकियोत भाविनाला खेळताना पाहून शहारे येत होते. खरेतर भाविनासारख्या खेळाडू अपंग नाही तर त्यांच्या अपंगत्वाला सहकार्य करत तिला क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मदत नाकारणारे खरे मानसिक अपंग आहेत. यंदाच्या स्पर्धेत तिने भारतासाठी पदकाचे खाते उघडले आता पुढीलस्पर्धेत तसेच या कालावधीत जगभरात होत असलेल्या विविध स्पर्धांमध्येही तिने अशीच अविश्वसनीय कामगिरी करावी हीच अपेक्षा आहे. मनात जिद्द असेल तर काय घडू शकते हे भाविनाने दाखवून दिले आहे.
कुटुंबाने खेळला गरबा
भाविनाने रजतपदक मिळवले व हा क्षण पाहात असलेल्या तिच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या कुटुंबीयांनी घरात जणू उत्सव असल्यासारखेच वातावरण तयार करत चक्क गरबा खेळण्याचा आनंदही लुटला. भाविना राहते त्या संपूर्ण परिसरात पेढे वाटले गेले. एक अपंग असूनही तिच्या कारकिर्दीसाठी अपार कष्ट करणाऱ्या तिच्या कुटुंबीयांचाही आदर्श अन्य पालकांनी घेतला तर देशात केवळ क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्य होईल यात शंका नाही.
अवनीची सुवर्ण सलामी
भारताच्या अवनी लेखराने नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. ही कामगिरी आजवर भारतीय नेमबाजांना या स्पर्धेत जमली नव्हती. ज्या हातात कधी नेमबाजीची पिस्तूल येईल यावर कोणी विश्वासही ठेवला नसता त्याच हातांनी आज देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. अवनीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 229.1 गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. वयाच्या 12 व्या वर्षी झालेला जीवघेण्या अपघातून सावरत अवनीने 10 मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले.
धोलपूरहून जयपूरकडे येत असताना संपूर्ण लेखरा कुटुंबीयांना अपघात झाला. त्यावेळी 11 वर्षांच्या असणाऱ्या अवनीच्या मणक्याला दुखापत झाल्याने तिला अपंगत्व आले. अवनीने 2018 साली भारताची प्रसिद्ध नेमबाज व प्रशिक्षक सुमा शिरूरच्या नेमबाजी अकादमीत कसून सराव केला व पात्रता स्पर्धेतून टोकियोचे तिकीट मिळवले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दिलेल्या संधीचा पुरेपूर लाभ अवनीने घेतला व देशाला या क्रीडा प्रकारात पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णयश मिळवून दिले. विश्वकरंडक स्पर्धेत तिने रजतपदक मिळवले होते. तर त्यानंतर क्रोएशियात झालेल्या स्पर्धेतही असेच रूपेरी यश प्राप्त केले तेव्हाच ती टोकियोतही गुणवत्ता सिद्ध करणार हा विश्वास होता.
सुमितचे भालाफेकीत सुवर्ण
नीरज चोप्राकडून प्रेरणा घेत आता भालाफेकीत भारतीय खेळाडू वर्चस्व गाजवत आहेत. भारताच्या सुमित अंतिलने सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला आहे. इतकेच नव्हे तर, सुमितने यंदाच्या स्पर्धेत विश्वविक्रमाचीही नोंद केली. असे म्हटले जाते की एक खेळाडू यशस्वी ठरला की त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळते व ते देखील जागतिक यश प्राप्त करतात. हेच सुमितने दाखवून दिले.
सुमितने एफ-64 गटात 68.55 मीटर अंतरावर भाला फेकत विश्वविक्रम नावावर केला. त्यापूर्वी भारताच्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्येच सुवर्णपदक मिळवले होते. आपल्या खेळाडूंनी पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली असून यातूनच नवनवीन खेळाडू गवसतील असा विश्वास वाटतो. सुमित हा मूळचा हरियाणाचा आहे. तो सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. एका अपघातात सुमितला एक पाय गमावावा लागला. मात्र, त्याने खचून न जाता नव्या उमेदीने आयुष्य जगायला तसेच क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करण्यास सुरुवात केली. त्याच्या याच जिद्दीमुळे देशाला पॅरालिम्पिकचे पदक मिळाले.
विनोद कुमार
विनोद कुमारने थाळीफेकीत ब्रॉंझ पदक पटकावले होते. विनोद मात्र कमनशिबी ठरला. अपंगत्वाचे नियम सुस्पष्ट नसल्याचे सांगत आयोजकांनी त्याचे ब्रॉंझ पदक काढून घेतले. अर्थात यानंतरही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे मोल कमी होत नाही. यंदाच्या स्पर्धेतील भारताच्या पॅरा खेळाडूंची कामगिरी पाहिली तर आकांशापुढती आकाश ठेंगणे म्हणतात हेच खरे.
एकाच दिवसात पंचकार
या स्पर्धेत एकाच दिवसात (सोमवारी) भारतीय खेळाडूंनी देशाला पाच पदके मिळवून दिली. हा विजयी पंचकार भारताच्या जागतिक क्रीडा वर्चस्वाची नांदी ठरणार आहे हेच खेळाडूंच्या उज्ज्वल यशाने सिद्ध केले आहे. भारताने एकाच दिवशी दोन सुवर्ण, दोन रजत, तर एक ब्रॉंझपदक मिळवत स्पर्धेतील एकूण पदकांची सप्तमी साजरी केली.
नेमबाज अवनी लेखरा, भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदकाचा मान मिळवला. त्यांना साथ देताना थाळीफेकपटू योगेश कथुरिया व भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यांनी रजत पदक पटकावले, तर सुंदरसिंह गुर्जरने भालाफेकीतच ब्रॉंझ पदकाला गवसणी घातली. त्यापूर्वी भारताने तीन पदके मिळवताना टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा राष्ट्रीय क्रीडा दीन साजरा केला होता. भाविनाने टेबल टेनिसमध्ये, तर निशाद कुमारने उंच उडीत रजतपदके पटकावली.
– अमित डोंगरे