पुणे – गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रख्यात उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांनी आरएमडी फाउंडेशनच्या मदतीने शिष्यवृत्ती योजना राबवून गेल्या 18 वर्षांपासून आजपर्यंत 12 हजारांपेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारिवाल यांनी दिली.
रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजनदेखील करण्यात आले होते. कार्यक्रमास पुनीत बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन, अभिनेते मकरंद अनासपुरे, युवा अभिनेता अभिनेता आकाश ठोसर आदी उपस्थित होते. यावेळी 425 पेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान केले.
आमच्या वडिलांची सामाजिक कार्यपरंपरा सतत सुरू राहण्यासाठी त्यांचे कार्य आम्हाला प्रेरित करते. त्यांच्याच आशीर्वादाने आज भारतभर अनेक सामाजिक उपक्रम सर्वसामान्य लोकांसाठी राबविण्यात येतात. यापुढेही नवनिर्माण योजना राबविल्या जातील, अशी भावना फाउंडेशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरवेळी अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थितांनी रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मनपा अधिकारी, उद्योजक, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी रक्तदानात सहभाग घेतला. सर्व रक्तदात्यांचे शोभाताई आर. धारिवाल यांनी आभार मानले.
“विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात नशेच्या आहारी जाऊ नये. तसेच आपण निवडलेल्या अभ्यासक्रमातून देशसेवा करावी. समाजासाठी जे-जे उपयोगी आहे, ते आम्ही आरएमडी फाउंडेशनच्या माध्यमातून करत राहू.” – जान्हवी धारिवाल-बालन, अध्यक्षा, आरएमडी फाउंडेशन
“प्रख्यात उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नाही. पण, आपल्या स्वकर्तृत्वाने आणि कठीण परिस्थितीतूनही उद्योगाच्या उच्च शिखरावर ते विराजमान झाले. तसेच सामाजिक कार्यातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा देशभर उमटवला.” – शोभाताई आर. धारिवाल, उपाध्यक्षा, आरएमडी फाउंडेशन