पुणे – बाजार समिती आवाराबाहेर नियममुक्ती आहे. त्यामुळे बाहेर खरेदी-विक्री करण्यासाठी कोणताच कर लागत नाही. परिणामी, मार्केट यार्डाऐवजी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची पद्धत खरेदीदारांकडून रूढ होत आहे. शहरातील मोठे व्यापारी तसेच मॉलधारक शेतात जाऊन उत्कृष्ट शेतमालाची खरेदी करतात.
त्यानंतर राहिलेला माल शेतकऱ्यांकडून बाजारात पाठवून दिला जात आहे. त्यामुळे मार्केटयार्डात दुय्यम दर्जाचा माल येण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. येथील तरकारी विभागात दररोज ७० ते १०० ट्रक शेतीमालाची आवक होते. त्यातील सुमारे ४० टक्के माल दुय्यम दर्जाचा असतो. याचा मार्केट यार्डातील व्यापारावर गंभीर परिणाम होत आहे. बाजारात दर्जेदार माल येण्यासाठी प्रयत्न करणे बाजार समिती प्रशासनापुढे आव्हान आहे.
शेतात उत्कृष्ट दर्जाचा माल खरेदी केला जातो. ज्याचा व्यापाऱ्याला फायदा होतो. स्वस्तात माल मिळतो. तोच माल, व्यापारी चढ्या भावाने शहर, उपनगरांतील बाजारपेठेत विकतात. दर्जा चांगला असल्याने ग्राहकही पैसे जास्त देऊन माल खरेदी करतो. शेतकऱ्यालाही या पद्धतीचा फायदा होत आहे. माल तोडून विक्रीसाठी बाजारात आणण्याची गरज नाही. वाहतूक खर्च, हमाली भरावी लागत नाही. तसेच, माल बाजार समितीच्या आवारात आणल्यास त्यावर सेस भरावा लागतो. त्यामुळे त्याची किंमत वाढते. पूर्वी शेतकरी सेस भरायचे.
मात्र, आता खरेदीदारांकडून सेस आकारण्यात येतो. परिणामी, खरेदीदारांना उत्कृष्ट दर्जाच्या मालाच्या तुलनेत बाजार आवारातील माल महाग ठरतो. त्याचा दर्जाही कमी असतो. बाजारात दर्जेदार मालाची आवक झाली, तरी तो माल बाहेर मिळणाऱ्या किंमतीपेक्षा महाग असतो. परिणामी, दर्जा चांगला असूनही त्याला अपेक्षित गिऱ्हाईक मिळत नाही. त्यातच शेतकऱ्यांचा माल विकताना कमिशन मिळणे बंद झाल्याने व्यापारीही आता स्वत:च्या जबाबदारीवर माल विकण्यास तयार होत नसल्याने बाजारावर मंदीचे सावट आहे.
“बाजार आवारात दाखल होणार्या मालामध्ये दुय्यम दर्जाच्या मालाचे प्रमाण जास्त आहे, हे वास्तव आहे. बदलत्या परिस्थितीमुळे हे घडले आहे. आगामी काळात शेतकऱ्यांमध्ये जागृती करून बाजार आवारात अधिकाधिक दर्जेदार शेतीमाल येण्यासाठी प्रयत्न करणार आहे.” –
दिलीप काळभोर, सभापती, पुणे बाजार समिती
“बाजार समितीच्या आवारात सर्व नियमन सुरू आहे. इतर ठिकाणी कोणतेही नियमन नाही. त्यामुळे बाजारात मोठी आवक होत असली, तरीही त्यामध्ये दर्जाहीन मालाचे प्रमाण जास्त आहे. परिणामी, बाजारात काही प्रमाणात मंदीचे सावट आहे. ते दूर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जास्त भाव मिळावा, यासाठी बाजार आवार नियमनमुक्त करण्याची आमची मागणी आहे.” – विलास भुजबळ, ज्येष्ठ आडतदार, मार्केट यार्ड